
रात्रीची वेळ होती. घरात सर्वच झोपलेले होते. एका खोलीत पत्नी होती. दुसऱ्या खोलीत तीन मुली. उद्याची सकाळ सर्वांनाच हादरवून सोडेल हे कुणाच्याही ध्यानीमनी नव्हते. घराचा कर्तापुरुष मध्यरात्री उठला आणि त्याने जे करायचं नव्हतं ते केलं. पहाटे घरात चार मृतदेह पडलेले होते. हे दृश्य पाहून सर्वच हादरले. या हत्याकांडाची इन्साईड स्टोरी समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राहुल झाने असं का केलं? याचा पोलीस शोध घेत आहेत. चार कारणांमुळे त्याने हे कृत्य केलं असावं, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्या दिशेने पोलीस तपास करत आहेत.
बापानेच तीन मुली आणि पत्नीचा खून केल्याचा आरोप आहे. या हत्याकांडाने सर्वच हैराण झाले आहेत. पत्नी आणि तीन मुलींची हत्या केल्यानंतर सकाळी त्याने वडिलांना चहा बनवून दिला. त्यानंतर घरातून बाहेर पडला आणि फरार झाला. जयपूरच्या करधनी परिसरातील ही घटना आहे. सकाळी 10 वाजता पोलिसांना खबर मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले आणि धक्कादायक प्रकार पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. पोलिसांनी घराची झडती घेतली. पहिल्या मजल्यावर राहुल झाची पत्नी गीता झाचा मृतदेह सापडला. त्यानंतर पोलीस तळमजल्यावर आले. दोन वेगवेळ्या खोलीत तीन मुलींचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली.
गाढ झोपेत असतानाच…
नंदिनी, राधिका आणि गौरी यांचे मृतदेह दिसले. आई आणि तीन मुलींची हत्या झाल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पोहोचली. त्यामुळे या परिसरात एकच गर्दी झाली. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, मध्यरात्री ही घटना घडली असावी. चारही जण गाढ झोपेत असताना राहुलने त्यांच्या डोक्यात दगड टाकून त्यांना मारून टाकलं. चौघांच्या डोक्यावर गंभीर दुखापत झालेली आहे. घटनास्थळी पोलिसांना एक दगडही सापडला आहे. पोलीस आता सर्व पुरावे गोळा करून टाइमलाईनची तयारी करत आहेत.
गुजरातहून आला
पोलिसांच्या मते, हत्याकांडानंतर राहुल झा हा नेहमी सारखाच वावरला. सकाळी 7 वाजता उठून तो दूधवाल्याकडे गेला. त्याच्याकडून दूध घेतलं. त्यानंतर घरी आला. बुजुर्ग वडील लक्ष्मीनाथ यांच्यासाठी चहा बनवला. त्यांना चहा पाजला आणि त्यानंतर तो घरातून निघून गेला. राहुल शेअर ट्रेंडिंगमध्ये काम करत होता. काही दिवसांपूर्वीच तो गुजरातहून जयपूरला आला होता.
चार कारणे
त्याची पत्नी गीता घराच्या पहिल्या मजल्यावर बुटिक चालवत होती. मोठी मुलगी नंदिनी शिक्षण घेत असतानाच खासगी नोकरीही करत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी राहुलने शेजारच्या महिलेकडून 25 हजार रुपये उधार घेतले होते. त्यामुळे राहुल आर्थिक अडचणीत होता का? त्याच्या कुटुंबात काही वाद होते का? शेअर ट्रेंडिंगमध्ये त्याला आर्थिक नुकसान झालं होतं का? की हत्याकांडामागे दुसरंच कारण आहे? या प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहेत. पोलिसांनी सध्या आर्थिक अडचण आणि कौटुंबिक वाद या दोन अँगलने चौकशी सुरू केली आहे. तसेच फरार राहुलचाही शोध घेत आहेत.
Leave a Reply