
शिंदे सेनेकडून ‘ऑपरेशन टायगर’ राबवून ठाकरे गटाचे 14 आमदार फोडण्याच्या चर्चेवर आता पालकमंत्री भरत गोगावले यांनी सूचक उत्तर दिलंय. “काही गोष्टी झाकली मूठ सव्वा लाखाची असते, सगळंच उघड करायचं नसतं. ज्यावेळेस ऑपरेशन सक्सेस होईल, त्यावेळेला आमचे शिंदे साहेब तुम्हाला सांगतील,” असं म्हणत गोगावलेंनी मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत दिले आहेत. “शिंदे साहेबांचं काम कसं आहे, हे तुम्हाला माहिती आहे,” असंही गोगावले म्हणाले.
मंत्री भरत गोगावले यांनी मीडियाशी संवाद साधताना हे सूचक विधान केलंय. पालकमंत्री पदासाठी नवस केल्याच्या वक्तव्यावरही भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही हिंदुत्ववादी लोक आहोत. माझ्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जे मागितलं, बोलले, ते आमचं कर्तव्य आहे. देवाला नमस्कार करणं आणि गोरगरिबांचे आशीर्वाद घेणं गरजेचं आहे,” असं गोगावले म्हणाले.
पालकमंत्री म्हणून आपला कार्यकाळ संपेपर्यंत चांगलं काम करण्याची इच्छा व्यक्त करताना सर्वांना बरोबर घेऊन जाणार, आमदार, खासदार आणि मंत्री अधिकारी या सर्वांना सोबत घेऊन काम करणार, असं म्हणत गोगावलेंनी अप्रत्यक्षपणे खासदार सुनील तटकरे यांना सूचक टोला लगावल्याची चर्चा आहे.
डिक्लरेशनसाठी आग्र्याला जावं लागलं
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीतील शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या श्रेयवादाला आता नवं वळण मिळालं आहे. रायगडचे नवनिर्वाचित पालकमंत्री भरत गोगावले यांनी पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीवरून मिश्किल टिप्पणी केली आहे. रायगडच्या पालकमंत्री पदाचं डिक्लरेशन घेण्यासाठी मला आग्र्याला जावं लागलं, अशी मिश्किल टिप्पणी गोगावले यांनी केली आहे. रायगडचं पालकमंत्रीपद मागील काही महिने रिक्त होतं. अखेर भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती झाली. मात्र, या नियुक्तीनंतर महायुतीतील अंतर्गत श्रेयवाद पुन्हा समोर आला आहे.
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिंदे सेना विरुद्ध सुनील तटकरे असा संघर्ष पाहायला मिळत असतानाच, आमदार महेंद्र दळवी यांनी यापूर्वी मागील दीड वर्ष पालकमंत्रीपद सुनील तटकरे यांनी अडवून ठेवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता भरत गोगावले यांच्या आग्रा आणि डिक्लरेशनच्या मिश्किल टिप्पणीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
उद्या मुख्यमंत्र्यांशी पुन्हा चर्चा करणार
दरम्यान, गणेशोत्सव तोंडावर आला असताना खारपाडा टोलनाका बंद करण्याची मागणी जोर धरतेय. याबाबत गोगावले यांनी उद्या पुन्हा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून टोल थांबवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं स्पष्ट केलंय. रस्ता पूर्ण झाला, बिनधास्त टोल घ्या, आमचा विरोध नाही, असं म्हणत अपूर्ण रस्त्यासाठी टोल आकारण्यास गोगावलेंनी विरोध दर्शवलाय.
दरम्यान, त्यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी रोह्यात अधिक लक्ष देणार असल्याचं आणि म्हसळ्याची हंडी फोडणार असल्याचं विधान केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना भरत गोगावले यांनी विकास गोगावले हे विकासकामांच्या संदर्भातच बोलले आहेत, दुसरं काही नाही, असं स्पष्ट केलं. तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्या सोबत आले असल्यास त्यांच्या भागातही विकासकामांसाठी निधी दिला जाईल, असं त्यांनी सांगितलं.
तर कर्जतमधील अंगणवाडीत निकृष्ट दर्जाचा आहार दिल्याच्या तक्रारीवर त्यांनी कडक कारवाईचा इशारा दिलाय. याबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेणार असून, हा विषय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही चर्चेला आला असल्याचं गोगावलेंनी सांगितलं.
Leave a Reply