
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गीतकार भरत व्यास यांनी लिहिलेले 'ऐ मालिक तेरे बंदे हम' हे गीत आजही देशभरातील अनेक शाळांमध्ये प्रार्थना म्हणून गायले जाते. मात्र, हे गीत शाळा किंवा धार्मिक कार्यक्रमासाठी नाही तर 1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दो आंखें बारह हाथ' या चित्रपटासाठी लिहिण्यात आले होते.
या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका ज्येष्ठ अभिनेते व्ही. शांताराम यांनी साकारली होती. चित्रपटात गुन्हेगारांना शिक्षा देण्यापेक्षा त्यांचे पुनर्वसन करण्यावर भर देणाऱ्या जेलरची कथा आहे. एका भावनिक प्रसंगात कैदी आपल्या चुका मान्य करून ईश्वराकडे योग्य मार्गावर चालण्याची प्रार्थना करतात.
याच प्रसंगासाठी भरत व्यास यांनी 'ऐ मालिक तेरे बंदे हम' हे गीत लिहिले. लता मंगेशकर यांच्या भावपूर्ण आवाजाला वसंत देसाई यांच्या सुरेल संगीताची साथ लाभल्याने हे गीत अजरामर ठरले. पुढे त्याच्या प्रेरणादायी आशयामुळे देशातील अनेक शाळांनी ते आपल्या दैनंदिन प्रार्थनेचा भाग बनवले.
राजस्थानातील बीकानेर येथे जन्मलेले भरत व्यास हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत मानाचे गीतकार होते. 1950 आणि 1960 च्या दशकात त्यांनी अनेक गाजलेली गीते लिहिली.
भरत व्यास यांच्या गीतांमधील अर्थपूर्ण शब्द, आध्यात्मिकता आणि मानवी मूल्यांचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी असून त्यांची गीते काळाच्या ओघातही तितकीच लोकप्रिय राहिली आहेत.




Leave a Reply