
पुण्यातील अत्यंत वादग्रस्त केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता ज्येष्ठ वकील आणि राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम यांची एण्ट्री झाली आहे. निकम हे देशातील अनेक हाय-प्रोफाइल खटल्यांमध्ये सरकारी पक्षाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ओळखले जातात. 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणात त्यांनीच अजमल कसाबला फाशी मिळवून दिली होती. आता केतन अग्रवाल प्रकरणात त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाल्याने या तपासाला मोठं वळण प्राप्त झालं आहे. उज्ज्वल निकम यांनी स्वत: या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी त्यांना फोन केल्याचं त्यांनी सांगितलं. यावर निकम म्हणाले, “या घृणास्पद हत्येनं संपूर्ण देश हादरला आहे. महाराष्ट्रात कायद्याचं राज्य प्रस्थापित झालं पाहिजे आणि याच भावनेनं मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की, होय मी नक्कीच या प्रकरणाची चौकशी करेन. सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे. आरोपपत्र दाखल झाल्यानंतरच प्रकरणाची संपूर्ण परिस्थिती स्पष्ट होईल.”
पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्याजवळ दरीत पडून 26 वर्षीय केतन अग्रवालचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा एक अपघात मानला गेला, परंतु नंतरच्या तपासात हा एक पूर्वनियोजित खून असल्याचे पुरावे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया आणि तिचा कथित साथीदार चेतन यांना अटक केली आहे.
उज्ज्वल निकम यांची फी किती?
मिळालेल्या माहितीनुसार, उज्ज्वल निकम प्रत्येक सुनावणीसाठी अंदाजे 40 हजार रुपये फी आकारतात. करारानुसार नियुक्ती झाल्यावर निकम यांना त्यांच्या न्यायालयीन उपस्थितीसाठी 40 हजार रुपये दिले जातात. यामध्ये व्यावसायिक सल्ला शुल्क आणि खटल्याशी संबंधित इतर खर्चांचाही समावेश असतो. वरिष्ठ सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी अनेक मोठ्या आणि संवेदनशील खटल्यांमध्ये सरकारचं प्रतिनिधीत्व केलं आहे.
उज्ज्वल निकम यांनी 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी दहशतवादी कसाबला फाशीची शिक्षा मिळावी, यासाठी प्रदीर्घ लढा दिला होता. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत ते 1993 मधील मुंबई बॉम्बस्फोट, गुलशन कुमार हत्या प्रकरण, प्रमोद महाजन हत्या प्रकरण, 2008 मधील मुंबई हल्ला, 2013 मधील मुंबई सामूहिक बलात्कार प्रकरण, 2026 च्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातही विशेष सरकारी वकील होते. निकम यांना भारत सरकारने 2016 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं.
वाढदिवस साजरा करण्याची बतावणी करून सिया गोयलने 18 जून रोजी केतनला लोहगडावर नेऊन प्रियकराच्या मदतीने ढकलून दिलं होतं. सकाळी दहा ते पावणेअकराच्या सुमारास लोहगडावरील हत्ती तलावाच्या बाजूला असलेल्या दरीत सिया आणि चेतनने केतनला ढकलून दिलं. त्यानंतर केतन तोल जाऊन पडल्याचा कांगावा सियाने केला. केतनच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या अकस्मात मृत्यूबद्दल त्यांनी शंका व्यक्त केली. त्यानंतर सियाला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं. या चौकशीदरम्यान तिने प्रियकराच्या मदतीने केतनला कड्यावरून ढकलून देऊन खून केल्याची कबुली दिली.
Leave a Reply