
‘लॉक अप : सच या सजा’ या रिअॅलिटी शोचा दुसरा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिझनचा पहिलाच एपिसोड अनेक स्पर्धकांसाठी बराच भावनिक होता. एकीकडे अभिनेत्री आकांक्षा चमोलाने खुलासा केला की ती आणि तिचा पती गौरव खन्ना घटस्फोट घेण्याच्या उंबरठ्यावर आहेत. तर दुसरीकडे ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता हर्षद चोपडासुद्धा त्याच्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. शोमध्ये येण्यापूर्वी हर्षदच्या गर्लफ्रेंडने त्याच्याच सर्वांत चांगल्या मित्रासोबत मिळून फसवणूक केली. याच कारणामुळे मी वैयक्तिक आयुष्यात लोकांमध्ये कमी मिसळतो आणि सोशल मीडियावरही फार सक्रिय नसतो, असा खुलासा हर्षदने केला आहे.
हर्षद गेल्या दोन दशकांपासून टीव्ही इंडस्ट्रीत काम करतोय. मात्र त्याच्या खासगी आयुष्याबद्दल अनेकांना फारशा गोष्टी माहीत नाहीत. प्रीमिअरच्या एपिसोडमध्ये हर्षद त्याच्या आवडीनिवडीविषयी आधी व्यक्त झाला. मात्र शोमध्ये प्रेक्षकांसमोर त्याला ‘कृतघ्न’ म्हटलं गेलं. हर्षदने सूत्रसंचालक रितेश देशमुख आणि फराह खान यांना सांगितलं की, “माझ्या मते चाहते फक्त माझ्या प्रोफेशनल कामावर लक्ष देतात. मी त्यावर जास्त मेहनत घेण्याचा प्रयत्न करेन. मला आणखी चांगलं बनायचं आहे. मी कृतघ्न आहे, हा टॅग मला पुसून काढायचा आहे.” यानंतर हर्षदने ‘लॉक अप’मध्ये ‘एक्सपोज’ कार्ड उघडला, ज्याअंतर्गत त्याला सहस्पर्धक शिवांगी जोशीला एकतरी गुपित सांगायचं होतं. यावेळी हर्षद त्याच्या रिलेशनशिपबद्दल व्यक्त झाला.
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
“मी एकाच वेळी माझ्या अत्यंत जवळच्या मित्राला आणि गर्लफ्रेंडला गमावलं. माझ्या गर्लफ्रेंडने माझ्याच खास मित्रासोबत मिळून माझी फसवणूक केली. तेव्हापासून मी सावध राहू लागलोय. हेच माझं गुपित आहे”, असं तो सांगतो. यावेळी भावूक झालेल्या हर्षदला शिवांगी समजावण्याचा प्रयत्न करते. ही घटना 16 वर्षांपर्यंत कोणालाच कळू शकली नव्हती, असाही खुलासा त्याने केला. या घटनेनंतर तो भावनिकदृष्ट्या अधिक संवेदनशील झाला. यावेळी रितेशने त्याच्या धैर्याची प्रशंसा केली. तर मनावरील सर्वांत मोठा भार हलका केल्याबद्दल फराह खानने त्याची पाठ थोपटली.
Leave a Reply