
वर्षभरात ज्या सणाची उत्साहाने, आतुरतेने वाट पाहिली जाते तो म्हणजे गणोशत्सव.. बाप्पाची वाट पाहणारे भाविक आतुर झाले असून, यंदाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबईत तर या सणाचा उत्साह आणि आनंद वेगळाच असतो. मुंबईनगरीच्या गल्ल्यागल्यांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची धूम असते. पंधरा -सतरा दिवसांवर लाडक्या बाप्पाचा हा उत्सव आता येऊन ठेपला असून मंडळांची जोरदार तयारी सुरू आहे. मुंबईत उद्या विविध गणेश मंडळांच्या बाप्पांचे आगमन सोहळे पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर चिंचपोकळी-लालबाग परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. चिंचपोकळीच्या प्रसिद्ध चिंतामणी गणपतीच्या आगमनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
परळ शहरात नुकताच जो राडा झाला, त्या पार्श्वभूमीवर पोलिस अधिक सतर्क झाले असून चोख सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. चिंतामणीच्या आगमनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवता यावं, यासाठी तब्बल 800 ते 1000 पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत. एवढंच नव्हे तर मुंबई पोलिसांसोबतच रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) आणि CRPF चे जवानही यावेळी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत. गर्दीचं नियोजन करता यावं, वाहतूक नियंत्रणात रहावी आणि कायदा -सुव्यवस्था चोख राखण्यासाठी पोलिसांकडून विशेष नियोजन करण्यात आलं आहे.
चिंचपोकळी चिंतामणी मुंबईतला प्रसिद्ध गणपती
चिंचपोकळी चिंतामणी हा मुंबईतील १०५ वर्षे जुन्या गणेशमंडळापैकी एक असून अतिशय प्रसिद्ध गणपती आहे. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाची स्थापना 1920 साली मध्ये करण्यात आली. त्याच्या आगमन सोहळ्याला दरवर्षी शहरात अतिशय मोठ्या प्रमाणात गर्दी होते. आपल्या लाडक्या चिंतामणीचं देखणं रुप भरभरुन पाहता यावं, यासाठी आगमन सोहळ्याला हजारो भाविक, भक्त हे आवर्जून उपस्थित असतात, त्यामुळे प्रचंड गर्दी पहायला मिळते. दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांची मोठी उपस्थिती अपेक्षित आहे. त्यामुळे गणरायाच्या आगमनाचा हा सोहळा, उत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी पोलिस प्रशासन अतिशय सतर्क असून कडेकोट बंदोबस्ताची तयारी करण्यात आली आहे.
परळमध्ये दोन गटांमध्ये तुफान राडा, अनेक जखमी
परळ परिसरात बुधवारी रात्री दोन गटांमध्ये हिंसक झटापट झाल्याची घटना घडली. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी तीन जणांविरोधात तसेच काही अज्ञात आरोपींविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात पोलिसांची कारवाई सुरू होती. तेव्हाच या वादाला सुरुवात झाली, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. त्यानंतर सुमारे ५० ते ६० दुचाकीस्वार आणि ३० ते ४० युवकांमध्ये जोरदार वादावादी झाली. पुढे या वादाचे रूपांतर हाणामारी आणि दगडफेकीत झाल्याचे समोर आलं. या घटनेत काही तरुणांसह पोलिस कर्मचारीही जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर परळ, लालबाग आणि चिंचपोकळी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील तपास सुरू केला.
Leave a Reply