
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी आज मुंबईत जेन झी आणि जेन अल्फा वयोगटातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले होते. यातील एक प्रश्न हा आरक्षणाबाबत होता. या प्रश्नावर मोहन भागवत यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे. भागवत यांनी म्हटले की, ‘या प्रश्नाचे मी थेट उत्तर देणार नाही. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुसरण करावे लागेल. पण समाजात जोपर्यंत सामाजिक भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण राहील. मात्र, यावर राजकारण होता कामा नये. कारण यामुळे समाजात भेद निर्माण होतो आणि परिणामी एकता वाढत नाही.’
आरक्षणाबाबत मोठं विधान
मुंबईतील या कार्यक्रमात भागवत यांना एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला की, शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण आजही लागू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही ते इतक्या काळासाठी राहील असे कदाचित अपेक्षित केले नसेल. त्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत नाही का? याला उत्तर देताना भागवत यांनी, ‘जोपर्यंत समाजात सामाजिक भेदभाव अस्तित्वात आहे, तोपर्यंत आरक्षण कायम राहील. मात्र, ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला आहे, त्यांनी इतरांनाही संधी मिळावी याचा विचार करायला हवा. ज्या समाजघटकांना आरक्षणाचा लाभ मिळाला आहे, त्यांच्या मनातही आम्हाला लाभ मिळाला, आता इतरांना संधी द्या असे मत व्यक्त होऊ लागले आहे’ असं विधान केले आहे.
Gen Z देशविरोधी नाही
मोहन भागवत यांनी जेन झी पिढीबाबत बोलताना म्हटले की, ‘जेन झी ने विरोध करू नये असे मी म्हणणार नाही, पण विरोध करण्याची एक योग्य पद्धत असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात ती सांगितली आहे. जेन झी आपला आवाज उठवत आहे, कारण त्यांना ते आवश्यक वाटते. ते देशविरोधी नाहीत, ते देशविरोधी एजंट नाहीत. ते आपलेच लोक आहेत, आपली पुढची पिढी आहेत. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज आहे.’
शिक्षण व्यवस्थेत बदलांची गरज
शिक्षण व्यवस्था आणि आंदोलनांबाबत विचारलेल्या प्रश्नावर मोहन भागवत म्हणाले की, ‘आंदोलन हे देखील संवादाचाच एक प्रकार आहे. अन्यथा ती केवळ वादविवादाची बाब राहते. लोकांमध्ये संवाद झाला तर चांगले परिणाम मिळतात. लोकशाहीत आंदोलन हे व्यापक सहमती निर्माण करण्याचे एक माध्यम असते. जेव्हा लोकांच्या समस्या ऐकल्या जात नाहीत, तेव्हा आंदोलन हा एक पर्याय बनतो. जेन झीच्या तक्रारी योग्य आहेत. भारताच्या शिक्षण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर सुधारणा होण्याची गरज आहे आणि त्यासाठी सातत्यपूर्ण संवाद आवश्यक आहे.’
Leave a Reply