
राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे यांच्या आरक्षणाच्या संदर्भात केलेल्या विधानावर नाना पटोले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने विविध घटकांना आरक्षणाबाबत जी आश्वासनं दिली होती, त्याचं पुढं काय झालं?, असा संतप्त सवाल नाना पटोले यांनी केला आहे. धनगर, मराठा, गोवारी, बंजारा अशा विविध जातींना आरक्षणाचं गाजर दाखवून सरकार निवडणुका जिंकते, मात्र दिलेली आश्वासनं पूर्ण करत नाही, असा आरोप त्यांनी केला. विखे पाटील काय बोलतात यापेक्षा राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर दिलं पाहिजे, असे पटोले यांनी म्हटले. सरकारमुळे राज्यामध्ये जाती-जातींमध्ये जो वाद निर्माण झाला आहे, तो सरकारने वेळीच थांबवला पाहिजे आणि सर्व घटकांना न्याय दिला पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
हा मागासवर्गीय समाजाचा अपमान
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेनंतर झालेल्या शुद्धीकरणाच्या प्रकारानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राष्ट्रपतींना भेटून शुद्धीकरण करणाऱ्यांवर व गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. काँग्रेस शिष्टमंडळाला राष्ट्रपतींची भेट अद्याप मिळालेली नाही आणि गेल्या तीन तासांपासून वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात अनेक खासदार दिल्लीतील पोलीस स्टेशनसमोर उभे असूनही त्यांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जात नाहीत. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली असून संविधानाने अस्पृश्यता, धर्मवाद व जातिवाद संपवून ‘विविधतेत एकता’ हा संदेश दिला असला, तरी सध्या देशात मनुवादाची व्यवस्था निर्माण करण्याची मानसिकता असलेले सरकार सत्तेत असल्यामुळेच हे सर्व घडत आहे. हा केवळ मल्लिकार्जुन खर्गे यांचा नसून संपूर्ण मागासवर्गीय समाजाचा अपमान करण्याचा प्रकार आहे, जो भाजपच्या उत्तराखंड सरकारकडून आणि केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून केला जात असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.
सावत्र भावांच्या पोटात दुखत आहे
राज्यातील लाडक्या बहिणींना बेईमान भावांनीच फसवलं असा आरोप नाना पटोलेंनी केला होता. यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी नाना पटोलेंवर नानांच्या नाना कळा असं म्हणत चांगलेच ताशेरे ओढले. लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाल्यामुळे सावत्र भावांच्या पोटात दुखत आहे, असा आरोप चित्रा वाघ यांनी केलाय. याबाबत नाना पटोले यांना विचारणा केली असता त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर अधिकच बोलणं टाळलं. मात्र येत्या काळात महिलाच राज्यातील सरकारला उत्तर देतील, असा निशाणा नानांनी राज्य सरकारवर साधला.
Leave a Reply