
माणसाचंआयुष्य खूप मौल्यवान, पण कधी काही त्रासामुळे किंवा समस्येमुळे एखादा व्यक्ती जेव्हा जीवन संपवण्याचा विचार करतो तेव्हा सर्वांनाच त्रास होतो. नाशिकच्या मालेगाव जिल्ह्यात कौटुंबिक वादातून एक भयानक घटना घडणार होती. मालेगावात गिरणा नदीवरील केटी वेअर बंधाऱ्यावर आत्महत्येचा थरार. रात्री तब्बल तीन तास हायव्होल्टेज ड्रामा सुरू होता. कौटुंबिक वादामुळे एका तरूणाने टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आजूबाजूचे लोक मदतीला धावून आले. आणि मीडिया टीमने त्याच्याशी शिताफीने संवाद साधत काही वेडंवाकडं न करण्याचा सल्ला देत, त्याची समजूत काढल. तीन तासांच्या नाट्यानंतर अखेर त्या तरूणाचा जीव वाचवण्यात यश आलं आणि सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला. या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.
नेमकं घडलं तरी काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव शहरात रविवारी रात्री गिरणा नदीवरील केटी वेअर बंधाऱ्यावर आत्महत्येचा थरार पाहायला मिळाला. कौटुंबिक कलहाला कंटाळून हामिद अन्सारी या व्यक्तीने पाण्याच्या प्रवाहाच्या मध्यभागी जाऊन बसत
जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र आजूबाजूच्यांना ते दिसताच खळबळ माजली. त्यानंतर सुरू झालं ते बचाव ऑपरेशन. रात्री आठ ते अकरा वाजेपर्यंत सुरू असलेल्या या थरारामुळे पोलिस, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि घटनास्थळी जमलेले नागरिक चिंतेत पडले होते. कुटुंबियांसह, जमलेल्या नागरिकांच्या जीवात जीव नव्हता. मात्र अखेर अथक प्रयत्नांनी त्या इसमाचा जीव वाचवण्यात यश आलं.
मीडियाने संवाद साधत घातली समजूत
हामित अन्सारी यांच्या घरात काही कारणावरून वाद झाला. कौटुंबिक कलहाला कंटाळलेल्या अन्सारी यांनी टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. ते थेट गिरणा नदीवरील केटी वेअर बंधाऱ्यावर जाऊन बसले आणि खाली उडी मारणारच होते. मात्र आजूबाजूच्या नागरिकांना हे लक्षात आल्यावर त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी देखील तेथे पोहोचले आणि ते त्यांना सातत्याने समजावत होते.
मात्र, कोणीही माझ्या जवळ आलं, तर नदीत उडी मारेन, असा इशारा हामिद अन्सारी देत होते. अशा नाजूक परिस्थितीत मीडिया टीमने दूरून संवाद साधत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्याशी बोलत, समजूत काढल्याने अन्सारी यांनी बंधाऱ्याच्या कडेला येण्यास तयारी दर्शवली. याच क्षणाचा अचूक फायदा घेत आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन दलाच्या दुसऱ्या पथकातील जवान दुसऱ्या बाजूने शिताफीने त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि अन्सारी यांना सुखरूप ताब्यात घेतले.
वेळीच दाखवलेला संयम, शांतपणे बोलणं, संवादकौशल्य आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे तिथे मोठी दुर्घटना टळली आणि एक जीव वाचला. त्यानंतर हामिद अन्सारी यांना किल्ला पोलीस ठाण्यात आणलं. त्यांची पुढील चौकशी सुरू आहे.
Leave a Reply