
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी महिला आणि बालविकास मंत्री आदिती यांच्या खासगी सचिवांवर गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. आदिती तटकरे यांचे खासगी सचिव राजेश गायकवाड महिलांशी अर्वाच्च भाषेत बोलतात, असा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे. तसेच बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचाही दावा त्यांनी केला आहे.
रोहिणी खडसे यांनी माध्यमांशी बोलताना राजेश गायकवाड आणि आदिती तटकरे यांच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली. बदल्यांच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी CBI किंवा अन्य स्वतंत्र यंत्रणेमार्फत व्हावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
दरम्यान, या सर्व आरोपांवर राजेश गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सर्व तक्रारी निराधार, तथ्यहीन आणि चुकीच्या उद्देशाने प्रेरित असल्याचे म्हटले आहे. तसेच स्वतःविरोधातील आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचा दावा त्यांनी केला. या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Leave a Reply