
बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर तृणमुल काँग्रेस अंतर्गत मोठा असंतोष खदखदत आहे. हळूहळू या असंतोषाचे परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे. सर्वप्रथम तृणमुल काँग्रेसच्या खासदार काकोली घोष यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर टीएमसीच्या ताब्यात असलेल्या नगर पालिकांमध्ये अंतर्गत कलहांमुळे सामूहिक राजीनामा सत्र सुरु झालं आहे. त्याचवेळी मंगळवारी काकोली यांच्यासह तृणमुलचे सहा आमदार बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या प्रशासनिक समीक्षा बैठकीत सहभागी झाले होते. बंगालच्या राजकीय वर्तुळात याचे विविध अर्थ काढले जात आहेत. काकोली घोष यांनी अलीकडेच जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. भाजप सरकारच्या बैठकीला त्या उपस्थित राहिल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे.
काकोली यांच्याशिवाय सुवेंदू अधिकारी यांच्या प्रशासनिक समीक्षा बैठकीला टीएमसी आमदार अनीसुर रहमान बिस्वास, स्वरूपनगर येथून बीना मंडल, हरोआचे आमदार मोहम्मद अब्दुल मतीन आणि बसीरहाट क्षेत्रातील तीन अन्य आमदार सहभागी झाले होते. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या बैठकीला उत्तर 24 परगणा, नदिया आणि हुगली जिल्ह्यातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. राजकीय जाणकारांनुसार काकोली घोष यांची उपस्थिती केवळ प्रशासकीय नाही, तर राजकीय दृष्ट्या सुद्धा महत्वाची मानली जात आहे.
मी माझ्या भागाच्या विकासासाठी इथे आले
या बैठकीत सहभागी झालेल्या टीएमसी नेता बीना मंडल म्हणाल्या की, ‘मी माझ्या भागाच्या विकासासाठी इथे आले आहे’. “आमचे एकूण सहा आमदार या बैठकीत सहभागी झाले. राज्य सरकारने आम्हाला बोलावलं होतं. म्हणून एक आमदार म्हणून मी इथे आलोय” असं टीएमसी नेते मोहम्मद अब्दुल मतीन म्हणाले.
पश्चिम बंगालच्या राजकारणात एक नवी सुरुवात
“पश्चिम बंगालच्या जुन्या राजकीय संस्कृतीपेक्षा वेगळी ही एक नवी सुरुवात आहे. आम्ही जेव्हा विरोधी पक्षात होतो,तेव्हा आम्हाला प्रशासनिक बैठकीला बोलावलं जात नव्हतं. आम्ही ठरवलं सर्व आमदारांना बोलावलं जाईल” असं मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. बारासातच्या खासदाराने सुद्धा सकारात्मक प्रतिक्रिया दिली. बसीरहाटमधील अनेक विरोधी पक्षाचे आमदार सुद्धा इथे आले आहेत. आम्ही त्यांच्यापैकी एकाला बोलण्याची संधी सुद्धा दिली.
Leave a Reply