
राज्यात पावसाने दडी मारली आहे, ऑगस्ट महिन्यात पाऊसच झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरीप हंगाम हातचा गेला आहे. बळीराजाचे डोळे आता पावसाकडे लागले आहेत. मात्र आता एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राज्यात गणेशोत्सव काळात पावसाचं जोरदार आगमन होणार आहे. 9 सप्टेंबरपासून ते 22 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज आहे. परतीचा पाऊस राज्यात चांगला बरसणार आहे, असा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.
काय आहे पंजाबराव डख यांचा नवा अंदाज?
9 सप्टेंबर रोजी राज्यात विखुरलेल्या स्वरुपात पाऊस पडेल, काही भागात पाऊस होणार आहे, तर काही भागात पाऊस होणार नाही. त्यानंतर 12 सप्टेंबर रोजी विदर्भातील काही भागांमध्ये पाऊस हजेरी लावणार आहे. ज्यामध्ये वर्धा, भंडारा, नागपूर, अमरावती, अकोला या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या शक्यता आहे. बारा सप्टेंबर नंतर मात्र राज्यात पावसाचा जोर वाढत जाणार आहे. 13 सप्टेंबर रोजी मात्र राज्यातील जवळपास सर्वच भागांमध्ये पाऊस हजेरी लावणार आहे. 14 सप्टेंबरला महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे, मान्सून पुन्हा एकदा संपूर्ण राज्य व्यापून टाकणार आहे. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण पट्टी, खानदेश, मराठवाडा या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 15 सप्टेंबर रोजी पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. दरम्यान त्यानंतर 17 ते 22 सप्टेंबर या काळात पावसाचा वेग चांगला असेल, मात्र सर्वदूर असा पाऊस होणार नाही. राज्यातील वेगवेगळ्या भागात पाऊस होईल, 14 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर पर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे, मात्र एकाचवेळी सर्वदूर असा पाऊस होणार नाही, तो वेगवेगळ्या भागात पाऊस होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.
राज्यात पवासाची दडी
दरम्यान राज्यात सध्या संपूर्ण ऑगस्ट महिना पाऊस झालेला नाहीये, राज्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. मात्र आता परतीचा पाऊस महाराष्ट्रात चांगला होण्याचा अंदाज आहे.
Leave a Reply