
भारताचा माजी क्रिकेटर, उत्तम खेळाडू विनोद कांबळी हा गेल्या काही वर्षांपासून खेळामुळे कमी आणि वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत आहे. त्याची प्रकृती ठीक नसल्यामुळे काही काळापूर्वी तो रुग्णालयात दाखल होता. आता विनोद कांबळीच्या तब्येतीबाबत चिंताजनक माहिती समोर आल्याने त्याच्याबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली. मात्र त्याच्य जवलच्या मित्रांच्या सांगण्यानुसार, त्यांची प्रकृतीआता स्थिर असून घाबरण्यासारखं काहीही नाहीये,
गेल्या काही काळात त्याच्या प्रकृतीत चढ-उतार होत आहेत, पण सध्या त्याच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आलं आहे. त्यामुळे काळजीत पडलेल्या चाहत्यांना थोडासा दिलासा मिळाल आहे. दरम्यान कांबळीच्या मित्रांनी देखील त्याच्या मदतीसाठी धाव घेतल्याची माहिती समोर आली होती.
डोक्यात क्लॉट, स्मरणशक्तीवर परिणाम
एका वृत्तपत्राशी बोलताना कांबळीचा जवळचा मित्र मार्कस क्योटो याने त्याच्या तब्येतीबद्दल अपडेट्स दिलेत. “सुमारे वर्षभरापूर्वी कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ आढळली होती, ज्यावर उपचार करण्यात आले. मात्र असं असलं तरी ही गाठ पूर्णपणे काढता येत नाही, ज्यामुळे भविष्यात ब्रेन स्ट्रोकचा धोका आहे. सध्या विनोद कांबळी चालू-फिरु तर शकतो, पण त्याची स्मरणशक्ती पूर्वीसारखी तल्लख नाही, कमकुवत झाली आहे, तो अनेक गोष्टी विसरतो” असं त्यांनू नमूद केलं.
दारू सोडली पण सिगारेट
एकेकाळी विनोद कांबळी हा दारूचे सेवन करायचा, पण आता त्याने दारू पिणं सोडलं आहे, जो सकारात्मक संकेत आहे. पण असं असलं तरी त्याचं स्मोकिंग, सिगारेट पिणं हे अजूनही त्याच्या शरीराराठी खूप धोकादायक आहे. जर त्याने धूम्रपान करणं सोडलं नाही तर पुढे जाऊन ते खूप महागात पडू शकतं असं डॉक्टर आणि त्याचे मित्र सांगतात.
मित्रांनी बनवला ग्रुप, आर्थिक मदतीसाठी पुढाकार
दरम्यान विनोद कांबळीच्या अनेक मित्रांनी त्याच्या मदतीसाठी व्हॉट्सॲप ग्रुप बनवला आहे. ज्याद्वारे वेळोवेळी आर्थिक मदत केली जाते. भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू आणि विनोद कांबळीचा मित्र सचिन तेंडुलकर, तसेच माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि कपिल देव हे देखील यापूर्वी विनोद कांबळीच्या मदतीसाठी, त्याच्या समर्थनार्थ पुढे आले होते.
गेल्या वर्षी 2 आठवडे उपचार
गेल्या वर्षी, विनोद कांबळी याची प्रकृती अचानक खालावल्यानंतर त्याला ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लघवीचा संसर्ग आणि स्नायूदुखीचा त्रास त्याला झाला होता. तपासण्या केल्यावर, त्याच्या मेंदूत रक्ताची गाठ असल्याचे निदान झाले. त्या रुग्णालयात विनोद कांबळीवर सुमारे दोन आठवडे उपचार करण्यात आले, त्यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि डिस्चार्ज देण्यात आला.रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, कांबळीने आपल्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि लोकांना दारू व अमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन केलं, कारण या वाईट सवयी आयुष्य उद्ध्वस्त करतात.
कांबळीचं क्रिकेट करिअर
विनोद कांबळीने 1993 ते 2000 दरम्यान भारतासाठी 17 कसोटी आणि 104 एकदिवसीय सामने खेळले. तो सर्वात जलद 1000 कसोटी धावा करणारा भारतीय फलंदाज आहे, आणि हा विक्रम आजही अबाधित आहे. 1991 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून भारतासाठी 104 एकदिवसीय आणि 17 कसोटी सामने खेळूनही, कांबळीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द एक दशकही टिकली नाही. 17 कसोटी सामन्यांमध्ये कांबळीने 54.20 च्या सरासरीने 1084 धावा केल्या, ज्यात चार शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, त्याने 104 एकदिवसीय सामन्यांमध्ये 32.59 च्या सरासरीने 2477 धावा केल्या, ज्यात दोन शतके आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे. 129 प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये, त्याने 59.67च्या सरासरीने 9965 धावा केल्या, ज्यात 35 शतके आणि 44 अर्धशतकांचा समावेश आहे. 221 लिस्ट ए सामन्यांमध्ये, कांबळीने 41.34 च्या सरासरीने 6,476 धावा केल्या, ज्यात 11 शतके आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे.
मनोरंजन क्षेत्रातही आजमावलं नशीब
क्रिकेटर असलेल्या विनोद कांबळीने अभिनयातही हात आजमावून पाहिला. 2002 साली संजय दत्त आणि सुनील शेट्टी यांच्यासोबत ‘अनार्थ’ या चित्रपटातून विनोद कांबळीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 2009 मध्ये, तो अजय जडेजा आणि माही गिल यांसारख्या कलाकारांसोबत ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटात दिसला. त्याने एका कन्नड चित्रपटातही काम केले आहे. तो अनेक टीव्ही मालिकांमध्येही दिसला आहे. 2009 मध्ये, त्याने ‘बिग बॉस’च्या तिसऱ्या पर्वात भाग घेतला होता.
Leave a Reply