
Uddhav Thackeray on Sanjay Deshmukh: खासदारांनी बंडाचा झेंडा हाती घेत शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा फुटीर खासदारांच्या मतदारसंघात झंझावाती दौरा सुरू झाला आहे. वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघात त्यांची आज तोफ धडाडली. त्यांनी या भागाचे खासदार संजय देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली. या खासदारांनी जनतेच्या मताचा अनादर केल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचवेळी संजय देशमुख यांचा किस्सा त्यांनी सांगितला.
स्वतःचीच सोयरीक जुळवली
यवतमाळ येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी संजय देशमुख यांचा समाचार घेतला. फुटीपूर्वी नेमकं काय झालं याची माहिती त्यांनी सबेत दिली. “दोन आठवड्यांपूर्वी खासदारांची बैठक घेतली. ते म्हणाले मला मुलीची सोयरीक जुळवायची आहे. व्हिडिओ कॉलवरून हजर राहतो. मला काय माहीत मुलीची सोयरिक जुळवत होते की स्वताची सोयरीक जुळवत होते. मी रात्री फोन केला. जुळलं का. हो म्हणाले. जुळलं दोन दिवसाने कळलं.” असा किस्सा उद्धव ठाकरे यांनी सांगितला.
गेले सासरी, आता नांदा तिकडे,. गद्दाराच्या कळपात नांदा. इथे वाघाचं जीवन जगत होते. तिकडे गाढवाचं जीवन जगा. जे लादलं जाईल ते वाहत राहा, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी संजय देशमुख यांच्यावर केली. शिवसेना ही प्रेम देणारी संघटना आहे. त्याच्या जीवावर सर्व आहेत. मी लढणार आहे. तुम्ही सोबत राहणार की नाही. आपलं हिंदूत्व माणुसकी लुटणार आहे. मंदीर लुटणारं नाही असे ते म्हणाले.
गद्दारांना जाब विचारा
हा गद्दार जिथे सापडेल तिथे जाब विचारा. मी निवडून आणलं, का गद्दारी केली. मला पैसे मिळाले असते तर मीही तुला पाडू शकलो असतो. पण मी भगव्याला जागलो. निष्ठेला जागलो. तू बोल का गद्दारी केली. असं विचारा. पुढचे तीन वर्ष हा कार्यक्रम करावा लागेल, असा कार्यक्रमच उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला.
निवडणुका नसतानाही फोडाफोडी केल्या जात आहे. हा काळ असा त्यांनी निवडला. लोकसभेला आलो होतो. त्यांची घोषणा होती अब की बार ४०० पार. मी म्हणालो होतो, अब की बार तडीपार. त्यांना संविधान बदलायचं आहे. फोडाफोडी करायची आहे. घटनेत बदल केला की पाहिजे ते करता येईल. गुलामगिरी आणि हुकूमशाहीची राजवट रोखण्यासाठी आपण मैदानात आहोत. बाकी राज्य उठतील तेव्हा उठतील. पण महाराष्ट्र जागा राहणार की नाही हा प्रश्न तुम्हाला विचारतोय. हे काम सोपं नाहीये. त्याने गद्दारी का केली. तर तुमचं स्वातंत्र्य हिरावून घ्यायचं आहे. पुढचा खासदार भगव्याचा कट्टर असला पाहिजे. शिवसेना एकच आणि भगवा एकच. दोन किंवा तीन वर्षाने जेव्हा निवडणुका होईल तेव्हा आजपासूनच कामाला लागा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.
Leave a Reply