
ठाण्यात वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची टंचाई तीव्र होत असून, त्यावर उपाय म्हणून ठाणे महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरातील वॉशिंग सर्व्हिस सेंटर्सवर निर्बंध घालण्यात आले असून, आजपासून 10 जूनपर्यंत दुचाकी आणि चारचाकी वाहने धुण्यास बंदी घालण्यात आली आहे. महापालिकेचे आयुक्त सौरभ राव आणि महापौर शर्मिला पिंपोलकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत पाणी विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार, अनेक सर्व्हिस सेंटर्सकडून बोरवेल, विहिरी तसेच महापालिकेचं पाणी मोठ्या प्रमाणात वापरलं जात असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशानुसार, संबंधित सर्व्हिस सेंटर्सना नोटीस देण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाणी जपून वापरावं, असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे.
Leave a Reply