
भारतीय क्रिकेटपटूंच्या व्यस्त वेळापत्रकावर माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी चिंता व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सततच्या आयोजनामुळे देशांतर्गत क्रिकेटला पुरेसं महत्त्व मिळत नसल्याचं त्यांचं मत आहे. खेळाडूंचा कामाचा ताण आणि दुखापती लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय वेळापत्रक सुलभ करण्याची मागणी त्यांनी बीसीसीआय आणि आयसीसीकडे केली आहे. भारतीय क्रिकेटपटू काही यंत्र नसल्याचं सांगत गावस्करांनी निर्णय घेणाऱ्यांना खेळाडूंच्या क्षमतेची मर्यादा लक्षात घेण्याचं आवाहन केलं. देशांतर्गत क्रिकेटला प्राधान्य न दिल्यास जागतिक दर्जाचे खेळाडू घडवण्यात अडचणी येतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
नेमकं काय म्हणाले गावस्कर?
गावस्करांचं म्हणणं आहे की , “भारतासाठी क्रिकेटचा सीझन कधीच संपत नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरु ठेवण्यासाठी घरेलू क्रिकेटही कुठेतरी मागे पडत आहे. त्यामुळे भारतातील नवे टॅलेंट समोर येत नाही. बीसीसीआयने यापूर्वीच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला होती की, यापुढील मालिकांचे नियोजन करताना या सगळ्याचा विचार केला जाईल. जेणेकरुन क्रिकेटपटू योग्य पद्धतीने तयारी करु शकतील.”
गावस्कर यांनी ‘स्पोर्टस्टार’मधील आपल्या लेखामध्ये लिहिले आहे की, आयसीसी जेव्हा आंतरराष्ट्रीय वेळापत्रकावर चर्चा करेल, तेव्हा निर्णय घेणाऱ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की खेळाडू हे यंत्र नाहीत. भारताच्या राखीव खेळाडूंच्या क्षमतेवर भाष्य करताना ते पुढे म्हणाले, भारताकडे एकाच वेळी तीन संघ मैदानात उतरवण्या इतकी खेळाडूंची ताकद आहे, अशी जगासमोर बढाई मारणे ठीक आहे. परंतु, सत्य हेच आहे की काही सामन्यांच्या निकालांनी दाखवून दिले की, संघर्ष करावा लागत आहे.
“आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याने आगामी मालिकांसाठी खेळाडूंचा आत्मविश्वास निश्चितच वाढेल. मात्र, जोपर्यंत देशांतर्गत क्रिकेटला योग्य प्राधान्य दिले जात नाही, तोपर्यंत देश जागतिक दर्जाचे खेळाडू निर्माण करू शकणार नाही”, असंही मत गावस्करांनी व्यक्त केलं आहे.
बीसीसीआयचे स्पष्टीकरण
दरम्यान, बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी स्पष्ट केले की, “दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या महत्त्वाच्या दौऱ्यांपूर्वी खेळाडूंना पुरेशी विश्रांती देण्यावर भर असेल. यामुळे खेळाडूंना तेथील परिस्थितीशी जुळवून घेण्यास आणि सराव सामने खेळण्यास पुरेसा वेळ मिळेल.” बीसीसीआय या महिन्यात होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीतही हा मुद्दा लावून धरणार आहे.
Leave a Reply