
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या डावात भारतीय फिरकी गोलंदाजीची जादू मैदानावर स्पष्टपणे दिसून आली. कर्णधार शुभमन गिलच्या चपळाईने आणि तल्लख क्षेत्ररक्षणाने चाहतेही चकित झाले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मानव सुथारनंतर, कुलदीप यादवनेही कामिंदू मेंडिसला बाद करून श्रीलंकेला मोठा धक्का दिला. मेंडिस क्रीझच्या बाहेर आला आणि त्याने कुलदीपच्या चेंडूवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फटका हवेत उंच गेला.
यावेळी, एक्स्ट्रा कव्हरला तैनात असलेल्या भारतीय कर्णधार शुभमन गिलने डावीकडे झेप घेऊन उत्कृष्ट क्षेत्ररक्षण दाखवत एकहाती अप्रतिम झेल घेतला. आत येणारा चेंडू पकडणे कठीण होते, पण गिलने आपला तोल सांभाळला आणि जमिनीवर पडतानाही चेंडूवरील पकड सोडली नाही. झेल पूर्ण केल्यावर गिलने हवेट उंड उडी मारली तर कामिंदू मेंडिसला निराश होऊन परतावे लागले. मानव सुथार आणि त्यानंतर कुलदीप यादव यांच्या फिरकी गोलंदाजीने श्रीलंकेच्या फलंदाजांना सुरुवातीला धक्के दिले आणि नंतर त्यांना गुडघे टेकायला भाग पाडले.
यापूर्वी, भारताचा संघ 462 धावांवर सर्वबाद झाला होता. कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या अगदी पहिल्याच षटकात, असिथा फर्नांडोने प्रसिद्ध कृष्णाला 2 धावांवर बाद करून भारतीय डाव संपवला. देवदत्त पडिक्कलने भारतासाठी शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. पडिक्कलने 230 चेंडूंचा सामना करत शानदार 167 धावा केल्या. आपल्या खेळीत त्याने 15 चौकार आणि एक षटकार मारला. पडिक्कलने केएल राहुलसोबत दुसऱ्या विकेटसाठी 162 धावा जोडल्या, तर पंतने 71 धावा जोडल्या.
दरम्यान, केएल राहुलने 175 चेंडूंमध्ये 82 धावा केल्या. राहुलने आपल्या खेळीत 10 चौकार आणि एक षटकार मारला. ध्रुव जुरेलनेही चांगली फलंदाजी करत 68 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले. मात्र, ऋषभ पंत आणि यशस्वी जैस्वाल यांना मिळालेल्या चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवता आला नाही. पंत 62 चेंडूंचा सामना करून 39 धावांवर बाद झाला, तर यशस्वीने पाच चौकारांच्या मदतीने 37 चेंडूंमध्ये 32 धावा केल्या.
कर्णधार शुभमन गिलने 16 धावा केल्या, तर रवींद्र जडेजाने 13 धावांचे योगदान दिले. मानव सुथारने 43 चेंडूंमध्ये 24 धावा केल्या. मोहम्मद सिराजने 11 धावा केल्या, तर कुलदीप यादव 13 धावांवर नाबाद राहिला. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे खेळाचे पहिले सत्र रद्द झाले, ज्यामुळे पहिल्या दिवशीही बराच काळ खेळात व्यत्यय आला होता. श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज प्रभात जयसूर्याने चार बळी घेतले. दरम्यान, कसोटी पदार्पण करणाऱ्या केसरा नुवान्थाने तीन बळी तर असिथा फर्नांडोने 2 बळी घेतले.
Leave a Reply