
राज्यातील ‘ऑपरेशन टायगर’च्या राजकीय घडामोडी अजूनही सुरू असून शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे नेते आणि वरळीतील प्रभावी चेहरा मानले जाणारे सचिन अहिर यांनी विधान परिषद उपसभापतीपदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सहा खासदारांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी संबंधित मतदारसंघांचा दौरा करत कार्यकर्ता मेळावे घेतले होते. या दौऱ्यात त्यांनी पक्ष सोडून गेलेल्या खासदारांवर जोरदार टीका केली होती. मात्र दौरा संपताच मुंबईत ठाकरे गटाला आणखी एक मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली.
सचिन अहिर हे उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी वरळी मतदारसंघात पक्षसंघटना मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. याच मतदारसंघातून आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक जिंकले होते. त्यामुळे अहिर यांच्या निर्णयाकडे मुंबईतील ठाकरे गटासाठी महत्त्वाचा धक्का म्हणून पाहिले जात आहे.
दरम्यान, या घडामोडीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर सूचक प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी, आम्ही चार किरणांचीही आस का धरावी? जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी? अशा ओळी शेअर करत पक्ष सोडणाऱ्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
त्यानंतर त्यांनी आणखी टीका करत, “जे पक्षात येतानाच स्वार्थ आणि बेईमानीचा कीडा घेऊन येतात, त्यांच्या जाण्याचे दुःख का करावे,” असे वक्तव्य केले. राऊत यांच्या या प्रतिक्रियेमुळे राज्याती ल राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून या घडामोडींवर पुढे कोणत्या प्रतिक्रिया उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply