
गुरुपौर्णिमेनिमित्त पुणे महानगरपालिकेच्या शाळेत आयोजित कार्यक्रमातील एका घटनेवरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. भाजपच्या नगरसेविका वर्षा भीमराव साठे यांनी पहिली आणि दुसरी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून स्वतःचे पाय धुऊन घेतल्याचा आरोप करण्यात आला असून, या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना रुपाली ठोंबरे-पाटील यांनी नगरसेविका वर्षा साठे यांच्यावर जोरदार टीका केली. “नगरसेवक झाल्यावर तुम्ही स्वतःला मालक समजता का? कोणत्या मानसिकतेतून लहान मुलांकडून पाय धुऊन घेतले?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, “२१व्या शतकात विद्यार्थ्यांकडून पाय धुऊन घेणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. अशा कृतीमुळे मुलांवर कोणते संस्कार होणार?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
रुपाली ठोंबरे-पाटील यांनी पुढे भाजप नेतृत्वालाही लक्ष्य करत, “पुण्यातील भाजप नेते याकडे दुर्लक्ष करत आहेत का? अशा प्रकारच्या कृतीला कोणताही पाठिंबा देता येणार नाही,” असे म्हटले. तसेच नगरसेविकेच्या शैक्षणिक पात्रतेवरही प्रश्न उपस्थित करत ही घटना अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमातील या कथित प्रकारामुळे पुण्यात राजकीय वातावरण तापले असून, या प्रकरणावर भाजपकडून अधिकृत प्रतिक्रिया काय येते आणि पुढे कोणती भूमिका घेतली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply