
नितीन कुट्टे, प्रतिनिधी : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पक्षांतर बंदी कायद्याचा आढावा घेण्यासाठी चार विधानसभा अध्यक्षांची समिती बनवली आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर या समितीच्या अध्यक्षपदावर आहेत. ही समिती पक्षांतरबंदी कायदा अधिक प्रभावी आणि परिणामकारक कसा करता येईल, याचा अभ्यास करत आहे. यावर शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवार बोलले आहेत. “आता ते कुठला वेगळा कायदा आणणार आहेत?. संविधानाला मानणारा अध्यक्ष त्या ठिकाणी असावा. आहे तो कायदा लागू केला, तर कुठलाही पक्ष फुटू शकत नाही. संविधानावर विश्वास ठेवणारा अध्यक्ष असावा. तो जे फक्त शब्दांचा खेळ करतायत. आम्ही हे करु, ते करु हे हास्यास्पद आहे” असं रोहित पवार म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने 7.8 टक्के जीडीपी विकास दराचा दावा केला आहे. त्यावर रोहित पवार बोलले. “नरेंद्र मोदी साहेबांना विनंती करायची आहे की, साहेब तुम्ही जे आकडे सांगताय, ते आकडे खरे नाहीत. तुमचे जीडीपी काढण्याचे आकडे चुकलेले आहेत असं तज्ञ सांगत आहेत” “शेतकऱ्याला भेटा, शेतकऱ्याची अवस्था काय आहे, महागाई किती वाढलेली आहे. पेट्रोल-डिझेलचे दर प्रचंड वाढलेले आहेत. सामान्य माणसाला खायचं जेवण परवडत नाहीय. मध्यवर्गीयांना विचारा त्यांचे पगार किती वाढलेत?. या देशात कोट्यवधी लोक आहेत, ग्रामीण भागात, शहरात, आयटीमध्ये काम करणारे आहेत, त्यांना विचारा. आपल्या देशाची प्रगती होत नाहीय” असं रोहित पवार म्हणाले.
पंतप्रधानांना खूष करण्यासाठी त्यांनी चांगली रेटिंग दिली
“जपानने क्रेडिच रेटिंग आपल्याला चांगलं दिलय. पण त्याची वेगवेगळी कारणं असू शकतात. त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, पण त्या प्रमाणात त्यांची अर्थव्यवस्था वाढत नाहीय. त्यामुळे त्यांच्याकडे असलेला पैसा दुसऱ्या देशात गुंतवायचा आहे. भारत मोठा देश असल्यामुळे बुलेट ट्रेनचा पैसा जपानकडून आला आहे. भारतात अजून पैसा, टेक्नोलॉजी देता यावी, त्याच्यावर त्यांचा देश वाढावा म्हणून पंतप्रधानांना खूष करण्यासाठी त्यांनी रेटिंग चांगलं केलं असावं. पण जो पर्यंत इतर देश आपलं रेटिंग सुधारत नाहीत, तो पर्यंत जपानच्या रेटिंगवर विश्वास ठेवता येणार नाही. त्यामुळे आमचं मत असं आहे की, वस्तूस्थिती समजून घेतली पाहिजे. कुठल्याही नेत्याची मन की बात समजून घ्यायची नाहीय. जन की बात समजून घेणं कुठल्याही नेत्याचं कर्तव्य आहे” असं रोहित पवार म्हणाले.
Leave a Reply