
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडत असून, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महत्त्वपूर्ण विधान करत भविष्यातील राजकारणाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. रोहित पवार म्हणाले की, यापूर्वी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये “पवार विरुद्ध पवार” अशी लढत पाहायला मिळाली असून, भविष्यातही अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. “लोकांची इच्छा आणि भावना महत्त्वाच्या असतात. अजितदादांची शेवटची इच्छा पवार कुटुंब एकत्र यावं ही होती, मात्र राजकीय निर्णय घेणं सोपं नसतं,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
तसेच, बारामतीत भविष्यात जय पवार आणि युग्रेंद्र पवार यांच्यातही सामना होऊ शकतो, असंही त्यांनी सूचित केलं. काही पक्ष पवार कुटुंबाची राजकीय ताकद कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “अजितदादा आज असते तर कदाचित पक्षाचं विलिनीकरण झालं असतं,” असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
दरम्यान, स्वतःच्या राजकीय भवितव्याबाबत बोलताना रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं. मात्र, “राजकारणात उद्या काय होईल हे सांगता येत नाही,” असं म्हणत त्यांनी परिस्थिती बदलू शकते, असे संकेत दिले.
Leave a Reply