
Rahul Gandhi : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या चांगलेच आक्रमक झाले आहेत. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर त्यांनी केंद्रातील मोदी सरकारला घेरलं आहे. जेन झींच्या आंदोलनानंतर ते तरुणाशी जास्तीत जास्त संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. शिक्षण, रोजगार असे मुद्दे उचलून ते मोदी सरकार किती अपयशी ठरलेले आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, आता राहुल गांधी यांनी आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवला आहे. ते येत्या 22 ऑगस्ट रोजी पुण्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यामध्ये ते तरुणांशी, विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
देशातील मुलींना सुरक्षा, समानता, संधी….
राहुल गांधी यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावर याबाबतची घोषणा केली आहे. ही घोषणा करताना त्यांनी मुलींना भेडसवणारे काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले आहेत. या देशातील मुलींना सुरक्षा, समानता, संधी, स्वत:चं मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य हवे आहे, असं राहुल गांधी म्हणाले आहेत. तसेच परंतु मुलींना ही संधी मिळते का? मुलींना आपल्या अधिकारांसाठी वाट पाहात राहावे लागते, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. येत्या 22 ऑगस्टला ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असेही त्यांनी या ट्विटमध्ये सांगितले आहे. पुणे येथे हा कार्यक्रम होईल. सोबतच या आंदोलनात सामील होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या नावाची नोंदणी करावी, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
जेन झींच्या आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी…
राहुल गांधी यांच्या या कार्यक्रमाची काँग्रेसतर्फे आतापासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तसेच माजी मंत्री विश्वजित कदम, यशोमती ठाकूर, मनोज त्यागी, अशा महत्त्वाच्या नेत्यांसह इतरही काही नेते, पदाधिकारी या कार्यक्रमाची तयारी करत आहेत. याआधीही राहुल गांधी यांनी तरुणांशी संवाद साधलेला आहे. दुसरीकडे जेन झींच्या आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांशी संवाद साधत आहेत. आगामी निवडणुका आणि राजकीय डावपेचाचा हा भाग असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजपा आणि विरोधी बाकावरील काँग्रेस यांना तरुणांना आकर्षित करण्यात किती यश येणार? पुढे काय घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Leave a Reply