
महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थिती, पीक विमा कंपन्यांकडून होणारी फसवणूक आणि वाढत्या महागाईने नागरिक त्रस्त आहेत. या गंभीर परिस्थितीत राजकारण बाजूला ठेवून जनसामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची मागणी प्रवीण स्वामी यांनी केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, आम्ही १००% उद्धव ठाकरेंसोबतच आहोत आणि आमदार फुटल्याच्या अफवा फेटाळून लावल्या.
स्वामी यांनी सांगितले की, यंदा जूनपासून आजपर्यंत केवळ १० ते १५% पाऊस झाला आहे, ज्यामुळे शेतीत मोठं नुकसान झालं आहे. जनावरांना चारा नाही, पिकं करपली आहेत आणि शेतकऱ्यांना वेळेवर पीक विमा मिळालेला नाही. पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप करत, सॅटेलाइट अहवाल नव्हे तर प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोग आणि कृषी विद्यापीठाचे अहवाल ग्राह्य धरण्याची मागणी त्यांनी केली.
याचबरोबर, साखरेचे, तेलाचे, डाळीचे, दूधाचे आणि गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडले असून सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक फोडण्याऐवजी जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यावर सरकारने लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन स्वामी यांनी केले.
Leave a Reply