
Prajakta Mali: मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि सूत्रसंचालिका प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अभिनय, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, व्यवसाय आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही प्राजक्ता अनेकदा चर्चेत असते. विशेषतः तिच्या लग्नाबाबत चाहते आणि सोशल मीडिया यूजर्सकडून वारंवार प्रश्न विचारले जातात.
इन्स्टाग्रामवरील 'आस्क मी एनिथिंग' सेशनमध्ये एका चाहत्याने प्राजक्ता माळीला लग्न या विषयावर प्रश्न विचारला. यावेळी प्राजक्ताने दिलेलं उत्तर नेटकऱ्यांमध्ये चर्चेत आलं आहे. प्राजक्ताला, लग्नासाठी येणारा दबाव ती कसा हाताळते आणि कधी इतरांपेक्षा आपण मागे पडल्यासारखं वाटतं का? असा प्रश्न विचारण्यात आला होता.
त्यावर प्राजक्ता माळीने कोणताही आक्रमक सूर न लावता तिचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सांगितला. प्रत्येक गोष्ट तिच्या योग्य वेळेनुसार घडते, असा तिचा विश्वास असल्याचं तिने स्पष्ट केलं. 'आयुष्यात जेव्हा जे व्हायचं असतं ते योग्य वेळी घडतं. त्यामुळे एखादी गोष्ट उशिरा होत आहे म्हणून सतत चिंता करण्याची गरज नाही. आपल्या वाट्याला जे काही आहे, ते योग्य वेळी आपल्यापर्यंत पोहोचेल,' असा सकारात्मक विचार ती करते.
मात्र, कुटुंबीयांना ही भूमिका समजावून सांगणं तितकं सोपं नसल्याचंही प्राजक्ताने मिश्कीलपणे सांगितलं. विशेषतः लग्नाच्या बाबतीत घरच्यांच्या अपेक्षा आणि समाजातील पारंपरिक विचार वेगळे असू शकतात. त्यामुळे स्वतःची भूमिका घरच्यांना समजावून सांगताना काहीशी अडचण येते, असंही तिने नमूद केलं.
याआधीही प्राजक्ताला ‘तू लग्न कधी करणार?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी तिने हा प्रश्न थेट तिच्या आई-वडिलांना विचारायला हवा, असं मजेशीर उत्तर दिलं होतं. त्यामुळे लग्नाच्या प्रश्नावर प्राजक्ता प्रत्येक वेळी आपल्या खास शैलीत उत्तर देताना दिसते.
प्राजक्ताचं हे उत्तर आजच्या काळातील अनेक तरुण-तरुणींच्या विचारांशी जोडलेलं आहे. करिअर, वैयक्तिक ध्येय आणि स्वतःच्या निर्णयांना प्राधान्य देताना लग्नासाठी घाई न करण्याची भूमिका ती मांडताना दिसते.






Leave a Reply