
22 जूनपासून राज्यात पावसाला दमदार सुरुवात झाली आहे. जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आनंदाचं वातावरण आहे. कारण आता मान्सूनच्या या पावसामुळे पेरण्यांना वेग येणार आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 27 जूनपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. 27 जून पासून 1 जुलैपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेजं अलर्ट तर काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये उद्यापासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर आता हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज देखील समोर आला आहे.
नेमका काय आहे हवामान अंदाज?
25 जुनपर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये खूप पाऊस झाला. नदी नाल्यांना पूर आले. मुक्ताईनगर, परभणी जिल्हा, अकोला, बुलढाणा, अमरावती जिल्हा, मुंबई सह कोकणात जोरदार पाऊस झाला. मात्र ज्या भागात अजून पाऊस पडला नाही, त्या शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. कारण 26 जूनपासून म्हणजे आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. 26 जून पासून ते 1 जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस पडणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ कोकण किनारपट्टी, घाट माथा या भागात जोरदार पाऊस होणार आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुंबई, पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता आहे. 2 जुलैपासून ते 6 जुलैपर्यंत राज्यातील काही भागामध्ये इतका पाऊस होईल की यापूर्वी इतका पाऊस कधीही पाहिला नसेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.
परतीचा पाऊस जोरात
दरम्यान हवामान विभागाकडून असं सांगण्यात आलं आहे की, यंदा पावसावर अल निनोचं सावट आहे, त्यामुळे पावसाचं प्रमाण कमी -कमी होत जाईल, परंतु पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा परतीचा पाऊस जोरात होणार असून, त्यामुळे खरीप आणि रब्बी अशी दोन्ही हंगामातील पिके चांगली येतील.
Leave a Reply