
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूर नव्या विश्व व्यवस्थेचं प्रतिक असल्याचं सांगितलं. मागच्यावर्षी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर सुरु करण्यात आलं. 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीर पहलगाम येथे लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवाद्यांनी 26 निष्पाप पर्यटकांची हत्या केली होती. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले होते. संरक्षण मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची निती स्पष्ट केली. ‘कुठल्याही परिस्थितीत दहशतवाद सहन केला जाणार नाही’
भारताने आधी सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक नंतर ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवादाविरुद्ध आपली भूमिका स्पष्ट केली होती. ऑपरेशन सिंदूर फक्त 72 तासात पूर्ण झालं. पण त्यामागे मोठी तयारी होती. गरज पडली असती, तर भारत मोठ्या लढाईसाठी सुद्धा पूर्णपणे तयार होता. खरंतर हे मोठं सिक्रेट आहे, जे आज वर्षभराने समोर आलं. आजचं विश्व वेगाने बदलतय. अनेक मोठे देश आपली ताकद वाढवत आहेत. राष्ट्रीय हिताचे मुद्दे आधीपेक्षा जास्त प्रखरतेने समोर मांडले जात आहेत. जुने नियम असलेल्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर अनेक प्रश्न आहेत. संयुक्त राष्ट्रासारख्या आंतरराष्ट्रीय संस्था कमकुवत झाल्या आहेत.
हे खरं म्हणजे दहशतवाद्यांना कवर फायर देण्यासारखं
दहशतवाद मानवतेवर काळा डाग असल्याचं राजनाथ सिंह म्हणाले. “दहशतवाद फक्त एक विकृत मानसिकता आहे. हा सुरक्षेचा मुद्दा नाही. मानवी मुल्यांच्या रक्षणाची लढाई आहे. दहशतवादाला नेहमी धर्म किंवा हिंसक विचारधारेच्या आधारावर योग्य ठरवण्याचा प्रयत्न केला जातो. हे खरं म्हणजे दहशतवाद्यांना कवर फायर देण्यासारखं आहे” असं राजनाथ सिंह बोलले.
खरी ताकद त्यांच्या वैचारिक आणि राजकीय मूळांमध्ये
“दहशतवाद फक्त राष्ट्रविरोधी कृत्य नाही, तर याची तीन अंग आहेत. एक ऑपरेशनल, दुसरं आयडियोलॉजिकल आणि तिसरं पॉलिटिकल. दहशतवादाची खरी ताकद त्यांच्या वैचारिक आणि राजकीय मूळांमध्ये आहे. दहशतवादाचं वैचारिक आणि राजकीय संरक्षण संपवलं नाही, तर दहशतवाद मिटणार नाही” असं ते म्हणाले. दहशतवादाशी फक्त सैन्याच्या स्तरावर नाही, तर तिन्ही अंगांविरोधात लढणं आवश्यक आहे असं ते म्हणाले. पाकिस्तान दहशतवादाला सतत समर्थन देतोय असा त्यांनी थेट आरोप केला. भारत दहशतवाद आणि त्यांच्या समर्थकांमध्ये काही फरक करत नाही हे त्यांनी स्पष्ट केलं.
Leave a Reply