
अतिवृष्टीमुळे काल दिवसभर ठप्प असलेली लोकल सेवा आज सकाळपासून सुरू झाली आहे. नालासोपार, वसई इथं रेल्वे ट्रॅकवर काही प्रमाणात पाणी असल्याने लोकल १५ ते २० मिनिट उशिराने धावत आहेत. पश्चिम रेल्वेचे मुख्य माहिती अधिकारी जॉर्ज वर्गीस यांनी याबाबतची माहिती दिली आहे. तर कल्याण-डोंबिवलीत पावसाने काही काळासाठी विश्रांती घेतल्याचं पहायला मिळतंय. मात्र ढगाळ वातावरण कायम आहे. त्यामुळे पुन्हा मुसळधार सरींची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर कल्याण-डोंबिवलीत आज पहाटेपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. सततच्या पावसामुळे अनेक रस्ते आणि सखल भाग जलमय झाले होते, शिवाय जनजीवनही विस्कळीत झालं होतं. दुसरीकडे मुसळधार पाऊस आणि प्रतिकूल हवामानाचा पुणे विमानतळावरील विमानसेवेवर परिणाम झाला आहे. खराब हवामानामुळे दोन विमानांचे मार्ग तात्पुरते बदलण्यात आले असून अनेक उड्डाणे विलंबाने सुरू आहेत. यासह राज्यातील, देश-विदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील इतर बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा..
Leave a Reply