
केतन हत्याकांडप्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोन्ही आरोपींची पोलीस कसून चौकशी करत आहेत. तसेच या प्रकरणात आणखी कुणा कुणाचा सहभाग आहे का? याचीही पडताळणी पोलीस करत आहेत. या प्रकरणात सिया गोयलने एक अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे. चेतनसोबतच्या अफेयरची माहिती कुटुंबाला देण्यापेक्षा केतनला मारणं अधिक सोपं होतं. चेतनसोबतच्या अफेयरबाबत सांगून कुटुंबाला त्रास द्यायचा नव्हता. त्यामुळेच चेतनला मारण्याचा पर्याय निवडल्याचं सियाने पोलीस तपासात सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी लोणावळा पोलिसांनी एकूण सहा टीम स्थापन केल्या आहेत. तसेच सियाचा भाऊ साहिलची काल 10 तास चौकशी करण्यात आली. आज सियाचे आई वडील आणि भावाची अजून चौकशी सुरू आहे. या चौकशीत बरीच माहिती समोर येऊ शकते, असं सांगितलं जात आहे. काल साहिलने पोलिसांना सियाची चेतनसोबत कशी ओळख झाली याची माहिती दिली होती. साहिल चेतनला ओळखत होता. एका क्रिकेट मॅचच्या दरम्यान त्याची बहीण चेतनला भेटली होती.
दिवाळी पार्टीत भेट
गेल्या वर्षी एका कॉमन फ्रेंडच्या दिवाळी पार्टीत भेटल्यानंतर सिया आणि चेतनची जवळीक वाढली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारीपासून आतापर्यंत या दोघांमध्ये दोन हजाराहून अधिक कॉल झाले. दोघांनी एकमेकांशी 238 तास बातचीत केली आहे. पोलिसांनी दोघांचे फोन जप्त केले आहेत. दोघांचेही फोन फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले आहेत. यातून आणखी बरीच माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
उज्ज्वल निकम यांची एन्ट्री
दरम्यान, केतनच्या आईवडिलांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी त्यांनी फडणवीस यांच्याकडे मदतीची मागणी केली. तसेच या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे देण्यात यावा, तसेच ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची या प्रकरणात नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ उज्ज्वल निकम यांची या प्रकरणात सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात निकम यांची एन्ट्री झाली आहे.
Leave a Reply