
लोणावळा येथील लोहगड किल्ल्यावरुन पडून केतन अग्रवाल या तरुणाचा मृत्यू झाला. आता या मृत्यूप्रकरणात नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सुरुवातीला हा अपघात असल्याचे बोलले जात होते. पण पोलिसांना शंका आल्यानंतर त्यांनी सखोल चौकशी केली. त्यानंतर या प्रकरणाने वेगळे वळण घेतले. हा अपघात नसून आखलेला कट असल्याचे समोर आले. तसेच राग, प्रेमविरोध आणि संतापातून हे घडवल्याचे समोर आले आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन यांनी मिळून ही हत्या केली. लग्न ठरल्यानंतर केतनला लोहगडावर नेऊन ढकलून मारण्याचा कट त्यांनी रचला होता. या हत्येसाठी त्यांनी तब्बल तीन वेळा प्रयत्न केले. मात्र, उंचीची भीती असल्याने केतन प्रत्येक वेळी नकार देत होता. शेवटी सिया गोयलने प्रचंड आग्रह धरल्याने तो लोहगडावर गेला आणि तिथे त्याची निर्घृण हत्या करण्यात आली.
प्लॅन ‘बी’ देखील तयार होता
पोलिसांना चेतनचे कडक उन्हात हुडी घालून फिरत असलेले सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. तांत्रिक पुरावे आणि साक्षीदारांच्या जबान्या यामुळे तपासाची दिशा पूर्णपणे हत्येकडे वळली आहे.
केतनच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे, आरोपींनी लोहगडवर यश न मिळाल्यास महाबळेश्वरला नेऊन खून करण्याचा दुसरा प्लॅनही तयार ठेवला होता. एवढेच नव्हे तर, काही दिवस आधी सिया गोयलने लोहगडावर आणून सापाची भीती दाखवत केतनला दरीत ढकलण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहितीही तपासात उघड झाली आहे.
भव्य लग्नाची तयारी, पण…
केतन आणि सिया यांचे लग्न ठरले होते. यासाठी १४ कोटी रुपयांचा भव्य महाल बुक करण्यात आला होता. मात्र, सियाला हे लग्न मान्य नव्हते. तिचे चेतनशी अनैतिक संबंध असल्याचेही समोर आले आहे. यामुळे तिने केतनला मार्गातून हटवण्याचा निर्धार केला. केतनच्या वडिलांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या तपासाचे कौतुक करत आपल्या मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस दोघांना अटक करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लोहगडावरील ही हनीमून-जत्रा न राहता खून-कट बनल्याने पुण्यातील व्यावसायिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
Leave a Reply