
पुण्यातील केतन अग्रवाल या तरूणाच्या हत्येचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. केतनला त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन यांनी किल्ल्यावरून ढकलून देऊन त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला केतन पाय घसरून किल्ल्यावरून पडल्याचे समोर आले होते, मात्र पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर हा घातपात असल्याचे समोर आले आहे. अशातच आता केतनचे काका दिनेश अग्रवाल यांनी याबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
केतन जाणार नव्हता पण सियाने…
केतनचे काका दिनेश अग्रवाल यांनी सांगितले की, ’19 तारखेला वाढदिवस होता, त्याआधी काही मित्रांसह तिथं आपण सेलिब्रेशन करणार आहोत असं सियाने केतनला सांगितलं. केतन जाण्यासाठी नको म्हणत असताना, सियाने ऐकलं नाही, त्यामुळे तो गेला. लोहगडावर गेल्यावर सियाने फोन करून सांगितलं की तो खाली पडला आहे. तो अमेरिकेतून मास्टर्स घेऊन आला होता. सुसभ्य होता. त्यामुळे तो पडला कसा? असा आम्हाला संशय आला.’
बघण्याच्या कार्यक्रमातच…
पुढे बोलताना दिनेश अग्रवाल यांनी सांगितले की, पोलिसांच्या तपासात काही गोष्टी निष्पन्न झाल्या, हत्येचा कट असल्याचा संशय आला. सियाने बॉयफ्रेंड सोबत जाऊन हा प्लॅन केला होता. सिया आम्हाला पसंत होती, तिला केतन पसंत होता. बघण्याच्या कार्यक्रमातच मुलगी बोलली मुलगा पसंत आहे. त्यामुळे 19 फेब्रुवारी रोजी साखरपु़डा झाला. 25 नोव्हेंबर रोजी लग्न होणार होतं. कधीच वेगळं काही मनात आलं नाही. आम्हाला तिच्या अफेयर्सची माहिती नव्हती. माहीत असतं तर लग्न मोडलं असतं.’
दोघांचे भांडण व्हायचे…
दिनेश अग्रवाल यांनी सांगितले की, ‘मार्च आणि एप्रिलमध्ये सियासोबत किरकोळ कारणावरून वारंवार वाद व्हायचे, आम्ही त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तिच्या वडिलांशी आम्ही बोललो नव्हतो, कारण फार मोठं काही झालं आहे अस वाटलं नाही. सिया केतनसोबत पार्टी करत होती, व्यवस्थित राहत होती, म्हणून संशय आला नाही. केतनची कट रचून हत्या केली आहे. जो कुणी सहभागी असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.’
Leave a Reply