
आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची कामगिरी एकदम सुमार राहिली आहे. आयपीएल स्पर्धेतील ताकदवान संघ म्हणून मुंबई इंडियन्सकडे पाहिलं जात होतं. मात्र प्रत्यक्षात कागदावरचे घोडे असल्याचं दिसून आलं आहे. या स्पर्धेत मुंबई इंडियन्स एकूण आठ सामने खेळली. त्यापैकी फक्त 2 सामन्यात विजय मिळवला, तर सहा सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे या स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून फार अपेक्षा उरल्या नाहीत. मुंबई इंडियन्सचा सहा सामन्यांचा खेळ शिल्लक आहे आणि प्लेऑफचं गणित सुटू शकते अशी स्थिती आहे. पण यासाठी प्रत्येक सामना करो या मरोची लढाई आहे. याची जाणीव मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याला आहे. आयपीएल स्पर्धेतील मुंबई इंडियन्स आपला नववा सामना चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल मुंबईच्या बाजूने लागला आणि कर्णधार हार्दिक पांड्याने प्रथम फलंदाजीला प्राधान्य दिलं. यावेळी त्याने प्लेऑफबाबत आपलं मत व्यक्त केलं.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की, ‘आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. खेळपट्टी चांगली दिसतेय. विश्वचषकादरम्यान आम्ही झिम्बाब्वेविरुद्ध खेळलो होतो, तेव्हा खेळपट्टी खूप चांगली होती. मागच्या सामन्यात आम्ही ज्या प्रकारे फलंदाजी केली, त्यावरून आम्हाला वाटले की फलंदाजांना शक्य तितक्या धावा करण्यासाठी आणखी एक संधी द्यावी.’ प्लेऑफमध्ये जा जागा मिळवण्यासाठी प्रत्येक सामना जिंकणं भाग आहे, यावर हार्दिक पांड्या म्हणाला की, ‘मला वाटतं की गेल्या आठ सामन्यांपासून हेच सुरू आहे. आता तर त्याहूनही जास्त. आम्हाला फक्त मैदानात उतरून आमचा सर्वोत्तम क्रिकेट खेळायचा आहे आणि पुढे काय होतं ते पाहायचं आहे.’
हार्दिक पांड्याने संघातील वातावरण आणि पुढच्या रणनितीबाबत सांगितलं की, ‘आमच्याकडून चांगला क्रिकेट खेळण्याची अपेक्षा असते. आम्ही प्रत्येक वेळी मैदानात उतरायलाच हवं. त्यामुळे हो, वातावरण चांगलं आहे. हे आव्हानात्मक आहे, पण जसं तुम्ही म्हणालात, आमच्याकडे खेळण्यासाठी खूप काही आहे. सहा सामने आहेत, आणि आम्हाला पात्र होण्यासाठी स्वतःला सर्वोत्तम संधी द्यायची आहे. आणि त्याच वेळी, हे प्रतिष्ठेसाठी खेळण्याबद्दल देखील आहे. तुम्ही खेळ आनंदासाठी खेळता, तुम्ही खेळ जिंकण्यासाठी खेळता. तर हो, या त्या सर्व गोष्टी आहेत ज्यांच्याबद्दल आम्ही बोललो आहोत आणि ज्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. ‘
Leave a Reply