
टीम इंडियाचा आयर्लंड दौरा दोन कारणांसाठी चर्चेत आहे एक म्हणजे श्रेयस अय्यरचं T20 कॅप्टन म्हणून पदार्पण आणि 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीचा डेब्यू. आयपीएल आणि इंडिया ए कडून दमदार कामगिरी केल्यानंतर वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी द्यावी अशीच सर्वांची इच्छा आहे. आता वैभवला पहिल्याच सामन्यात संधी द्यायची की नाही? हे हेड कोच गौतम गंभीर आणि टीमचा कॅप्टन श्रेयस अय्यरच्या हातात आहे. शुक्रवारी टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध दोन टी 20 सामन्यांची सीरीज खेळण्यासाठी मैदानात उतरेल, त्यावेळी नजरा फक्त श्रेयस अय्यरवर नसतील, तर वैभव सूर्यवंशीवर सुद्धा लक्ष असेल. वैभव सूर्यवंशी फक्त एक नाव नाहीय, तर क्रिकेटमधील एक वादळ आहे. आयपीएलपासून वैभवची क्रिकेट विश्वात चर्चा सुरु झाली. श्रीलंका दौऱ्यावर पहिल्या चार सामन्यात वैभव फ्लॉप ठरला. पण फायनलमध्ये श्रीलंका अ विरुद्ध त्याने 29 चेंडूत 94 धावांची खेळी करुन आपल्यात टॅलेंटची कमी नाही हे दाखवून दिलं. पण वैभव सूर्यवंशीची टीममध्ये निवड करताना संघाचं सुतलन देखील तितकचं महत्वाचं आहे.
भारताच्या विद्यमान टी 20 संघात ओपनिंगच्या जागा जवळपास निश्चित आहेत. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि ईशान किशन या तिघांपैकी एकाला बसवण्याचा विचारच करता येणार नाही. भारताच्या टी 20 वर्ल्ड कप विजयात या तिघांनी महत्वपूर्ण योगदान दिलं आहे. न्यूझीलंड विरुद्ध T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये सॅमसन, अभिषेक आणि इशान किशन तिघांनी अर्धशतक फटकावलं होतं. अशावेळी फक्त वैभवसाठी या तिघांपैकी एकाला बाहेर बसवणं सोपं नाहीय.
खाली आणावं तर नुकसान
संजू सॅमसन T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खतरनाक ओपनर आहे. ओपनिंग करताना त्याचा स्ट्राइक रेट 181 पेक्षा जास्त आहे. मधल्या फळीत आल्यानंतर हा स्ट्राइक रेट घसरतो. वैभवला संधी द्यायची झाल्यास सॅमसनला खाली आणावं लागेल. यात नुकसान होण्याचा धोका सुद्धा आहे.
टीम व्यवस्थापनासाठी कठीण निर्णय
दुसरीकडे अभिषेक शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये T20 मधील नंबर 1 फलंदाज आहे. त्याचा स्ट्राइक रेट 190 पेक्षा जास्त आहे. मागच्या अनेक सामन्यात तो मॅच विनिंग इनिंग्स खेळला आहे. अशावेळी वैभवसाठी अभिषेकला बाहेर बसवणं टीम व्यवस्थापनासाठी कठीण निर्णय असेल.
6 व्या क्रमांकावर एकमेव पर्याय
वैभवला संधी मिळो अथवा न मिळो टीममधील टॉप ऑर्डरमधील फलंदाजांवर त्याच्यामुळे दबाव नक्कीच तयार झाला आहे. आपली जागा घेण्यासाठी बाहेर कोणीतरी तयार आहे, हे संजू, अभिषेक आणि इशान तिघांना कळून चुकलय. संजू सॅमसनने आधी चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. पण विद्यमान संघात श्रेयस अय्यर आणि तिलक वर्मा यांच्या जागा त्या क्रमांकासाठी फिक्स आहेत. अशावेळी 6 व्या क्रमांकावर एकमेव पर्याय आहे. ही जागा ऑलराऊंडरची असते. शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर आणि सूर्यांश शेडगे यासाठी दावेदार आहेत. सॅमसन त्या क्रमांकावर आला, तर भारताला अतिरिक्त गोलंदाज खेळवता येणार नाही.
Leave a Reply