
बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी (Hema Malini) या गेल्या अनेक दशकांपासून मोठ्या पडद्यावर राज्य करत आहेत. त्यांचं सौंदर्य, अदाकारी आणि नृत्याचे आजही लाखो चाहते आहेत. लग्नानंतर, मुलींच्या जन्मानंतर त्या हळूहळू चित्रपटसृष्टीपासून दूर गेल्या होत्या आणि चित्रपटातील त्यांचा वावर अत्यंत कमी झाला होता. मात्र काही चित्रपटातून त्या मोठ्या पडद्यावर झळकल्या होत्या. 2020 साली आलेल्या ‘शिमला मिर्ची’ या चित्रपटात त्यांनी काम केलं होतं. मात्र आता इतक्या वर्षांनी त्या पुन्हा कमबॅक करणार का असा सवाल अनेक चाहत्यांच्या मनात आहे.
स्वतः हेमा मालिनी यांनी या प्रश्नाचे उत्तर दिलं. त्यांच्या वक्तव्यावरून सध्या तरी चित्रपटात कमबॅक करणे हे त्यांचं प्राधान्य नसल्याचं दिसतं. गेल्या वर्षी म्हणजेच 24 नोव्हेंबर 2025 रोजी धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांनी सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही जाणं कमी केले होते. केवळ अत्यावश्यक राजकीय कामांसाठीच क्वचितच सार्वजनिक ठिकाणी त्या दिसल्या होत्या. .
चित्रपटात पुनरागमन करण्याबाबत काय म्हणाल्या हेमा मालिनी ?
एका मुलाखतीत हेमामालिनी यांना चित्रपटात पुनरागमन करण्याबाबत विचारण्यात आलं, त्यावर त्या स्पष्टच बोलल्या. ‘सध्या तरी याचं उत्तर देणं कठीण आहे, कारण आत्ता मी याबद्दल विचारत करत नाहीये’ असं त्यांनी सांगितलं. ‘ सध्या जे आयुष्य सुरू आहे, त्यात मी आनंदी, खुश आहे’ असंही त्या म्हणाल्या.
पुढे बोलताना हेमामालिनी यांनी सांगितलं की, ‘ मी माझ्या मतदारसंघातील लोकांसाठी काम करते आणि घरी गेल्यावर माझ्या मुलांसोबत तसेच नातवंडांसोबत वेळ घालवते. माझ्या मुली, माझी नातवंड यांचं माझ्यावर खूप प्रेम करतात आणि त्यांची गरज आहे. एवढंच नव्हे तर धर्मेंद्र यांच्या आठवणींसोबतही मी आयुष्य जगत्ये. या आठवणीच माझं आयुष्य समृद्ध करतात, ‘ असं त्यांनी नमूद केलं.
लग्नानंतर काम कमी केलं, थांबवलं नाही
हेमा मालिनी यांनी सांगितलं की, जेव्हा मी लग्न करून मुलांचा निर्णय घेतला, तेव्हा चित्रपटांची संख्या आपोआप कमी झाली. मात्र, मी कधीही पूर्णपणे काम करणे थांबवले नाही, असं त्यांनी आवर्जून सांगितलं. अभिनयासोबतच मी दिग्दर्शनाकडेही वळले. ‘नूपुर’ ही टीव्ही मालिका तयार केली, जी प्रेक्षकांना आवडली. त्यानंतर मी ‘दिल आशना है’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केले. टीव्हीवरही ी अनेक प्रकल्प केले, ज्यामध्ये ‘वुमन ऑफ इंडिया’ याचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं.
चित्रपटांपेक्षा शास्त्रीय नृत्यात रमले
मात्र हेमा मालिनी यांचं आयुष्य केवळ चित्रपट आणि राजकारणापुरतं मर्यादित राहिलं नाही. शास्त्रीय नृत्य हा त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. मी ‘दुर्गा’, ‘महालक्ष्मी’, ‘राधा कृष्ण’ आणि ‘द्रौपदी’ यांसारखे बॅले सादर केले, जे पौराणिक कथा आणि शास्त्रीय नृत्यावर आधारित होते, असं त्या म्हणाल्या. ‘ मी कधीही रंगमंचावर फिल्मी गाण्यांवर नृत्य सादर केले नाही. असं केलं असतं तर कदाचित अधिक पैसे कमावता आले असते, कारण शास्त्रीय नृत्यातून तितकी कमाई होत नाही. मात्र, मी रंगमंचावर केवळ शास्त्रीय नृत्यच सादर करण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयावर ठाम राहिले’, असंही त्यांनी सांगितलं.
आता चित्रपटात परतणार का ‘ड्रीम गर्ल’?
त्यामुळे हेमा मालिनी यांच्या वक्तव्यावरून तरी बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याचा सध्या त्यांचा कोणताही ठोस प्लॅन नसल्याचं दिसतं. राजकारण, कुटुंब, मुले आणि नातवंडांसोबत वेळ घालवणे तसेच धर्मेंद्र यांच्या आठवणी जपणे हा त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. चाहत्यांना त्यांना पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा असली, तरी हेमा मालिनी सध्या आपल्या आयुष्याच्या या टप्प्याचा आनंद घेताना दिसत आहेत.
Leave a Reply