
आज विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान होत आहे. नाशिकच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कारण तिथे महायुतीत धुसफूस पहायला मिळालेली. गोकुळ गीते यांच्या माघारीसाठी दोन-दोन मंत्र्यांना मनधरणी करावी लागली. नाशिकमध्ये काही दगाफटका होऊ नये म्हणून भाजपंकडून विशेष काळजी घेतली जात आहे. गिरीश महाजन आज स्वत: नाशिकमध्ये आले. नगरसेवकांशी संवाद साधला. त्यानंतर ते मीडियाशी बोलले. “गोकुळ गीते यांनी सांगितलं, मला मतदान करु नका. मी उमेदवार नाही. नरेंद्र दराडेंना मतदान करा. हे त्यांनी सांगितलं, इथे कुठलाही प्रश्न शिल्लक राहिलेला नाही” असं गिरीश महाजन म्हणाले.
त्यावर पत्रकारांनी त्यांना, तुमच्यासारख्या मंत्र्याला नगरसेवकांना मतदानाला आणावं लागत असा प्रश्न केला. त्यावर गिरीश महाजन म्हणाले की, “निवडणूक कुठलीही असली तरी आम्ही गांभीर्याने घेतो. कुठल्याही निवडणुकीत थोडीशी ढील देत नाही” “निवडणूक छोटी असो वा मोठी शेवटी कार्यकर्त्यांसाठी आम्हाला यावं लागेल. कार्यकर्ते आमच्यासाठी मेहनत घेतात, त्यांना वाऱ्यावर सोडायचं? आमच्याकडे ही पद्धत नाही. ज्यांच्याकडे ही पद्धत आहे, त्यांची काय अवस्था झाली आपण पाहताय” असं गिरीश महाजन म्हणाले.
राडा करायला पण कोणी शिल्लक राहिलेलं नाही
“जास्त मतदान आम्हाला होणार. निवडणूक आहे, काळजी घ्यावी लागते. आमच्यासाठी आमचे कार्यकर्ते जागरण करतात, मेहनत घेतात. एकदिवस आम्ही त्यांना जाऊन भेटलो तर काय झालं?” असं गिरीश महाजन म्हणाले. उद्धव ठाकरे गटातील खासदार फुटीनंतर संजय राऊत यांनी राडा करण्याचं आव्हान केलं आहे. त्यावर “राडा करायला पण कोणी शिल्लक राहिलेलं नाही. ते दिवस गेले, जेव्हा तुम्ही आमच्यासोबत होता. ते आता राहिलचं नाही. काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात. राहुल गांधींना पंतप्रधान बनवा म्हणून मागे-मागे फिरता” अशी टीका गिरीश महाजन यांनी केली.
लोकच तिथे रहायला तयार नाहीत
“ग्राऊंडवर आहात कुठे, तुमचे लोक सुद्धा तुमच्यावर वैतागलेत, आमदार वैतागलेत. मुंबई महापालिकेतील नगरेसवक सुद्धा जय महाराष्ट्र करतील” असं गिरीश महाजन म्हणाले. “लोकांना वाऱ्यावर सोडलय. लोकच तिथे रहायला तयार नाहीत. त्यांना सांगतात ज्यांना रहायचय त्यांनी रहा, ज्यांना जायचय त्यांनी जा. पक्ष चालवण्याची ही कुठली पद्धत झाली. लोकांना थांबयचय कुठे तुमची बडबड ऐकण्यासाठी” अशा शब्दात गिरीश महाजन यांनी टीका केली.
Leave a Reply