
भारतात उन्हाळा सुरू झाला की अनेक पर्यटक युरोपामध्ये धाव घेतात. कारण तिथलं वातावरण या काळात थंड आणि अल्हाददायक असतं. पण यावेळी चित्र काही वेगळं आहे. संपूर्ण युरोपात उष्णतेची लाट पसरली आहे. फ्रान्स, ब्रिटेन, जर्मनी आणि इतर युरोपियन देशात तापमान 40 डिग्री सेल्सिसच्या जवळपास पोहोचलं आहे. त्यामुळे नागरिकांना उकाडा असह्य झाला आहे. इतकंच काय रस्तेही नरम पडले आहे. म्हणजेच या उष्णतेमुळे वितळू लागले आहेत. अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे अनेकांना हे व्हिडीओ पाहून धडकी भरली आहे. काही जणांना वितळणाऱ्या रस्त्यांबाबत प्रश्नही पडले आहेत. भारतात प्रत्येक वर्षी काही राज्यात तापमान 45 ते 50 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं. मग येथे रस्ते का वितळत नाही? भारतात इतकी उष्णता असताना रस्ते कसे काय सहन करतात? चला यातील फरक समजून घेऊयात
युरोपमधील रस्ते आणि तंत्रज्ञान
युरोपमधील रस्ते हे तिथल्या वातावरणाशी जुळवून घेणारे असतात. युरोपमध्ये थंड वातावरण असतं. त्यामुळे या रस्त्यांचा उद्देश बर्फवृष्टीचा सामना करण्यासाठी असतो. कधी कधी तापमान शून्य डीग्रीच्या खाली जातं. त्यामुळे बर्फ होणं आणि वितळणं या प्रक्रियेत रस्त्यांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे युरोपात रस्ते निर्मितीसाठी डामर एस्फाल्टचा वापर केला जातो. त्यात बिटुमेनची मात्रा अधिक असते. म्हणजेच नरम प्रतीचं डांबर वापरलं जातं. त्यामुळे रस्ते लवचिक असताना आणि अशा वातावरणात टिकून राहतात. थंड वातावरणात त्या रस्त्याला तडे जात नाहीत. पण तीव्र उष्णतेत हीच लवचिकता कमकुवत ठरते. तापमान वाढताच बिटुमेन नरम पडते आणि अवजड वाहनाच्या दाबामुळे ते पसरतं. तसेच त्यावर खड्डे पडतात. जर्मनीतही ट्राम सेवा असलेल्या रुळावर डांबर वितळून पसरलं होतं. त्यामुळे ही सेवा थांबवावी लागली.
भारतीय रस्त्यांचं तंत्रज्ञान युरोपपेक्षा वेगळं
युरोपपेक्षा भारतातील स्थिती वेगळी आहे. म्हणजे उन्हाळ्यात प्रचंड उष्णता असते. त्यामुळे युरोपसारखे रस्ते बनवले तर ते वितळून जातील. त्यामुळे रस्ते बांधताना कठीण आणि उच्च प्रतीचं डांबर वापरलं जातं. राष्ट्रीय महामार्ग आणि प्रमुख रस्त्यांवर व्हीजी-30 आणि व्हीजी-40 ही डांबराची श्रेणी वापरली जाते. त्यामुळे उच्च तापमानातही रस्ते मजबूत राहतात आणि तग धरतात. भारतीय रस्ते बांधणीसाठी मोठ्या आकाराची खडीही वापरली जाते. त्यामुळे पृष्ठभागावर दाब पडला तरी डांबर पसरत नाही.
Leave a Reply