
राजकारणात विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्याचं कौतुक केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत पवारांच्या वक्तव्याला महत्त्वपूर्ण म्हटलं आहे.
मुंबईत आयोजित ‘महाटेक CSR कॉनक्लेव्ह’ कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध CSR प्रकल्पांबाबत माहिती दिली. “महाराष्ट्रात सर्वाधिक CSR निधी येतो, मात्र तो प्रामुख्याने मुंबई आणि पुणे विभागात खर्च होतो. आता गडचिरोलीपासून नंदुरबारपर्यंत शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य विकास क्षेत्रात CSR उपक्रम राबवण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्याचं केलेलं कौतुक यावर बोलताना फडणवीस म्हणाले, “पवार साहेबांनी अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली. अनेक जण पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर टीका करत होते. मात्र या दौऱ्यात झालेल्या रणनीतिक करारांमुळे पुढील 10 ते 20 वर्षांसाठी देशाचं भवितव्य सुरक्षित होणार आहे. त्यामुळे विनाकारण टीका करू नये, पंतप्रधान देशहितासाठी काम करत आहेत,” असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
Leave a Reply