
महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीच्या निर्णयावरून वाद अधिकच तीव्र होत असल्याचं चित्र समोर येत आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील रिक्षा व टॅक्सी चालकांवर मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाला काही संघटनांकडून विरोध होत असून, सुमारे 14 लाख रिक्षाचालकांनी 4 मेपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर मनसे नेते अविनाश जाधव यांनी आक्रमक भूमिका घेत रिक्षाचालकांना इशारा दिला आहे. “गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू,” असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. तसेच, मराठी भाषा न येणाऱ्या चालकांना परवाने कसे देण्यात आले, याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे.
“महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी येणं आवश्यक आहे. मराठी येत नसेल तर परवाना रद्द करावा,” अशी ठाम भूमिका जाधव यांनी मांडली आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापलं असून, आगामी दिवसांत संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Leave a Reply