
राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या कथित ‘काळी जादू’ प्रकरणात नवे वळण येण्याची शक्यता आहे. दिवंगत अजित पवार यांच्या घराबाहेर काळी जादू करण्यात आल्याचे आरोप सातत्याने होत असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील काही नेत्यांनीही याबाबत शंका व्यक्त केली आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात मोठा गौप्यस्फोट करण्याचा दावा केला असून, त्या येत्या बुधवारी पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांच्या या खुलाशाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात अशोक खरात यांचे नाव समोर येत असून, त्यांच्या संपर्कात अनेक राजकारणी तसेच प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी असल्याचा आरोप करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही त्यांच्या ‘दरबारात’ हजेरी लावल्याचे म्हटले जात आहे. तसेच, 1825 या क्रमांकावरून खरात यांना अनेक फोन कॉल्स आल्याचा दावा करण्यात येत असून, काही प्रकरणांमध्ये त्यांनी स्वतःही संपर्क साधल्याचे सांगितले जाते. या सर्व कॉल्सची यादी आणि संबंधित व्यक्तींची माहिती अंजली दमानिया पत्रकार परिषदेत जाहीर करण्याची शक्यता आहे. दमानिया यांनी दावा केला आहे की, या यादीत काही मोठ्या राजकीय नेत्यांची नावे समोर येऊ शकतात, ज्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडू शकते. तसेच, या प्रकरणात यंत्रणेचा गैरवापर झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेत या सर्व आरोपांबाबत सविस्तर खुलासा होणार असल्याने, या प्रकरणात नेमके कोणाचे नाव समोर येते आणि त्याचे राजकीय परिणाम काय होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply