
गोविंद ठाकूर, प्रतिनिधी : मुंबईतील भाजपचे आमदार अतुल भातखळकर ब्रिक्स परिषद, गरब्यावरुन सुरु असलेलं राजकारण, MPSC परिक्षार्थींचं आंदोलन आणि दिशा सालियन प्रकरणावर बोलले आहेत. काँग्रेसने ब्रिक्स परिषदेवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. “काँग्रेसचा मोदीजी आणि भाजपवरचा द्वेष आता देशाच्या द्वेषात परावर्तित झाला आहे. यांच्या काळात ब्रिक्स झाला तर चांगला होता, आता मोदीजी भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स परिषद घेत आहेत म्हणून यांच्या पोटात दुखतय” अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली. अतुल भातखळकर हे कांदिवली विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. गरब्यावरुनही राजकारण सुरु आहे. नवरात्रौत्सवात गरबा सुर होईल. त्यावेळी गरब्यांना मुस्लिमांना प्रवेश देऊ नये, डोक्यावर टिळा असला पाहिजे या मागण्यांचं मंत्री, आमदार नितेश राणे यांनी समर्थन केलं आहे.
पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या बाबतीत वेगळं मत नोंदवलं आहे. “आपला उत्सव सर्वसमावेश आहे. एखादा मुस्लिम व्यक्ती जर गरब्यात येत असेल आणि नीट आनंद घेऊन जात असेल तर त्यात काही गैर वाटत नाही” असं अमृता फडणवीस म्हणाल्या. यावर अतुल भातखळकर यांना विचारलं असता ते म्हणाले की, ‘अमृता फडणवीस स्वतंत्र व्यक्ती आहेत, त्यांनी त्यांचं मत मांडलं’ याच गरब्याच्या विषयात आदित्य ठाकरेंच्या बाबतीत मात्र, भातखळकर यांनी वेगळं मत नोंदवलं.
मातोश्रीत दांडिया भरवा तिथे दिनू मोऱ्याला नाचवा
“आदित्य ठाकरेंना माझे आव्हान आहे, सर्व मुस्लिम सहकाऱ्यांना वंदे मातरमच्या सहापंक्ती गायला लावण्याची गॅरंटी घेणार का? प्रत्येक गरब्याच्या ठिकाणी माँ दुर्गाची स्थापना होते, मूर्तीपूजा मुस्लिमांना मान्य आहे का?” असा प्रश्न भातखळकर यांनी विचारला. “आदित्य ठाकरेंना मुस्लिमांना गरब्यात प्रवेश द्यायची एवढीच इच्छा असेल तर मातोश्रीमध्ये दांडियाचे आयोजन करा आणि दिनू मोऱ्याला घेऊन तिथे नाचवा” असं आमदार अतुल भातखळकर म्हणाले.
संजय राऊत नाराज फुफांचे मुखिया
MPSC परीक्षेच्या मुद्यावरुन संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना भातखळकर म्हणाले की, “संजय राऊत यांना संसदीय परंपरेचे ज्ञानही नाही आणि भानही नाही. संजय राऊत तुम्ही महाराष्ट्राचे नाराज फुफांचे मुखिया आहात” उद्धव ठाकरेंवरही त्यांनी हल्लाबोल केला. “त्यांचे मुख्यमंत्री अडीच वर्षे घराबाहेर पडले नाहीत, मंत्रालयात गेले नाहीत. त्यांनी बुलेट ट्रेन, मेट्रो, समृद्धी महामार्ग रोखण्याचे काम केले. उद्धव ठाकरे गटाला विकासावर बोलण्याचा अधिकार नाही”
Leave a Reply