
अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची कर्नल अभिजीत दीपके यांनी भेट घेतली. यावेळी दीपके यांनी राज्य सरकारला कठोर शब्दांत इशारा दिला. “मनोज जरांगेंना कोणी हात लावण्याचा प्रयत्न केल्यास संपूर्ण महाराष्ट्र इथे येईल,” असे ते म्हणाले. सरकारकडून सोनम वांगचूक यांच्यासारखे कृत्य जरांगेंसोबत करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. दिल्लीत सोनम वांगचूक यांना २६ दिवस उपाशी ठेवण्यात आले होते, तसाच प्रकार जरांगेंसोबत करण्याचा विचार सरकारने करू नये, असे दीपके यांनी ठणकावून सांगितले.
जरांगे पाटील गेल्या चौदा दिवसांपासून मराठा समाजासाठी उपोषण करत आहेत. यावर सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन तोडगा काढण्याची गरज आहे. “एक माणूस आपल्या समाजासाठी चौदा दिवस उपोषण करतोय, मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी येऊन त्यांची भेट घेतल्यास काय बिघडणार आहे?” असा सवाल दीपके यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातील जनता मनोज जरांगे यांच्यासोबत खंबीरपणे उभी असून, सरकारने तातडीने या विषयावर तोडगा काढावा, अशी मागणी दीपके यांनी केली.
Leave a Reply