
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतल्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदनानेही एकेकाळी या मालिकेत भूमिका साकारली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये सुरभीची भूमिका छोटी होती, पण त्यातही तिने प्रेक्षकांवर विशेष छाप सोडली होती. मात्र या मालिकेत काम करणं सोपं नसल्याचा अनुभव तिने सांगितला. कारण त्यावेळी सुरभी टीव्ही इंडस्ट्रीत नवीनच होती. तिला अभिनयाच्या बऱ्याच गोष्टी माहीत नव्हत्या.
'टेली मसाला' या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सुरभीने सांगितलं की, त्यावेळी तिला अभिनय फारसं येत नव्हतं. सेटवरच ती इतरांना पाहून हळूहळू शिकत होती. अनेकदा अभिनय न जमल्यामुळे तिला ओरडासुद्धा मिळायचा. “एक वेळ अशी आली होती की ते लोक म्हणायचे, अरे हिला अभिनयच येत नाही. हिला घरी पाठवा”, असा खुलासा सुरभीने केला.
पण अशा गोष्टींनी मी खचून गेले नाही. मी अजून मेहनत केली आणि इथवर पोहोचली. आजसुद्धा मी साकारलेल्या भूमिकेची आठवण काढली जाते. प्रत्येक वेळी तो एपिसोड पाहून लोक मला म्हणतात, बघ कुठून कुठपर्यंत तू आलीस”, अशा शब्दांत सुरभी व्यक्त झाली.
सुरभीला नंतर गुल पनागच्या 'कुबूल' या मालिकेतून मोठी संधी मिळाली. या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. सुरभी आज टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती निर्मातीसुद्धा बनली आहे. सुरभीने 2024 मध्ये बॉयफ्रेंड करण शर्माशी लग्न केलं. हे दोघं गेल्या 13 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.





Leave a Reply