
स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून ठाणे जिल्ह्यातील नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे. कल्याण आणि ठाण्यानंतर आता डोंबिवलीतील रहिवाशांनीही महावितरणविरोधात अनोखे आंदोलन छेडले आहे. डोंबिवली एमआयडीसी परिसरातील काही सोसायट्यांनी थेट महावितरणच्या मीटर केबिनलाच कुलूप ठोकत स्मार्ट मीटरला विरोध दर्शवला आहे.कोणतीही पूर्वसूचना न देता मीटर बदलू नयेत,अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा रहिवाशांनी लेखी निवेदनाद्वारे महावितरण कंपनीला दिला आहे.
स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेविरोधात डोंबिवलीतील नागरिक आता थेट मैदानात उतरले आहेत.डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरातील नवसंकुलसह काही सोसायट्यांमध्ये महावितरणच्या मीटर केबिनला कुलूप ठोकण्यात आले आहे.महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना न देता काही भागांत स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे आपल्या सोसायटीत अशी कारवाई होऊ नये,यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मीटर बॉक्सला कुलूप लावल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
यासंदर्भात रहिवाशांनी महावितरणला लेखी पत्र देत कोणतीही जबरदस्ती करू नये, आधी अधिकृत नोटीस द्यावी आणि त्यानंतरच सोसायटी स्तरावर निर्णय घेतला जाईल,अशी भूमिका स्पष्ट केली आहे.स्मार्ट मीटरमुळे वीजबिल वाढण्याची भीती आणि इतर तांत्रिक समस्यांबाबतही नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.दरम्यान,कुलूप लावलेल्या मीटर केबिनचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून डोंबिवलीतही असंतोष उफाळून आल्याचे दिसत आहे. महावितरणने याबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही डोंबिवलीकरांनी दिला आहे.
अंबरनाथमध्ये मनसेचे स्मार्ट मीटर आणि टीव्ही फोडत आंदोलन
मागील दोन दिवसांपासून नागरिकांना महावितरणकडून मेसेज पाठवले जात असून ४८ तासात स्मार्ट मीटर बसवलं जाणार असल्याचं सांगितलं जातंय. याबाबत नागरिकांमध्ये असलेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के, बबलू खान, प्रकाश नलावडे आणि विशाल गायकवाड यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे. गळ्यात स्मार्ट मीटर आणि वाढीव बिलांचे फोटो घालून मनसेनं महावितरण अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यानंतर महावितरण कार्यालयाबाहेर स्मार्ट मीटर आणि टीव्ही फोडून आंदोलन केलं. यावेळी महावितरणच्या विरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आली. नागरिकांना विश्वासात न घेता मीटर बदलण्याचा प्रयत्न केल्यास मीटर बदलायला आलेले कर्मचारी मार खातील, असा थेट इशारा यावेळी मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के आणि पदाधिकाऱ्यांनी दिला
Leave a Reply