
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. या निवडणुकीच्या प्रचारावेळी अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनी म्हटले होते की, ‘मला पक्षासाठी काम करायचं आहे. लोकांची जर इच्छा असेल की 2029 मध्ये मला उमेदवारी द्यावी तर ही त्यांची इच्छा आहे. मी आधीपासून बोलत आलो आहे की मी छोटा कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार हा सामना होणार नाही.’ जय पवार यांच्या या विधानामुळे सुनेत्रा पवार पुढची निवडणूक लढवणार नाहीत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी जय पवार यांच्या विधानाचा अर्थ सांगितला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
जय पवार यांच्या विधानावर बोलताना
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बारामती पोटनिवडणुकीवर बोलताना म्हटले की, ‘पक्षाने आधीच पाठिंबा जाहीर केला होता. अजित दादांना श्रद्धांजली देण्यासाठी आम्ही तो निर्णय घेतला. आता मतदानाची टक्केवारी किती होते आणि आकडा काय येतो त्यावर सगळं अवलंबून आहे. काँग्रेससोबत चर्चा झाली होती. विलंब झाला पण माघार घेण्यात यश आले होते.’
जय पवार यांच्या विधानाचा अर्थ
जय पवार यांच्या विधानावर बोलताना शिंदे म्हणाले की, ‘सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आता एक निवडणूक सुरु आहे. काही वेळेला वक्तव्य करणं गरजेचं नाही, आज ही चर्चा करणं गरजेचं नाही. फार जबाबदारीने बोलणं गरजेचं आहे. 2029 ला सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार नाही का असा त्याचा अर्थ होतो. पण अजित दादांच्या कुटुंबातील लोकांनी सध्या जबाबदारीने बोलणं गरजेचं आहे’ असं म्हणत जय पवार यांच्या विधानाचा अर्थ सांगितला.
विलीनीकरणावर शिंदे काय म्हणाले?
विलीनीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, ‘मित्रपक्षाला स्वतःच्या अस्तित्वाची लढाई करायची असते. हा धोका अजित दादांनी ओळखला होता आणि म्हणून पक्ष एकत्रित करण्याची तयारी सुरु होती. किती संख्या असली पाहिजे याचा आराखडा आणि नियोजन आम्ही केलं होत.’ अजित दादा मुख्यमंत्री झाले असते असंही शिंदे यांनी म्हटले होते.
भाजपवर टीका
विधानपरिषद निवडणूकीवर बोलताना शिंदे म्हणाले की, ‘आम्ही भूमिका जाहीर केली आहे. राज्यसभेला पवार साहेबांना त्यांनी पाठिंबा दिला होता. त्याच्यामुळे विधानपरिषदेच्या जागेसाठी उद्धव ठाकरे असतील किंवा अन्य कोणी आमचा पाठिंबा असेल. विधानपरिषद जागा वाढवण्यासाठी भाजप काही जीआर काढत आहेत का हे बघाव लागेल. इच्छुक संख्या जास्त आहे त्यामुळे नवीन जीआर काढून जागा वाढवतील’ असा टोला त्यांनी शिंदे यांना लगावला आहे.
Leave a Reply