
राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे, काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे 6 खासदार फुटले होते. या सर्वांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी या सर्व खासदारांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. आज उद्धव ठाकरे यांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या हिंगोली मतदारसंघात सभा घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आष्टीकर यांच्यासह एकमाथ शिंदे यांच्यावरही सडकून टीका केली. उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीतील सभेत बोलताना म्हटले की, ‘अनेकांना वाटतं दोन-पाच खासदार फोडले आणि चार पाच आमदार फोडले म्हणजे शिवसेना संपली. त्यांना कळत नाही आमदार, खासदार हा वेगळा भाग आहे. कट्टर शिवसैनिक हे वेगळे आहेत. हिंगोली मतदारसंघात लागोपाठ दोनदा गद्दारी झाली. आधीचा खासदार गेला. त्याला चोरवाटेने यावं लागलं. निवडून येण्यासाठी लोकांसमोर जाणार कसं. तोंडाला हळद नाही, काळं लागलं. आधीच्या खासदार गेला, त्यांनी तर निवडणुकीला उभं राहण्याचं धाडसंच केलं नाही. हिंगोलीची परंपरा आहे. कोणी इकडचा तिकडे गेला तरी शिवसैनिक कायम शिवसेनेसोबत राहिला आहे. गद्दारांसोबत गेला नाही. हे मिंधे नमक हराम आहे. मिंध्यांसकट सगळे नमकहराम हरामखोर आहेत. यांना काय द्यायचं बाकी ठेवलं होतं.’
आष्टीकरांवर गंभीर आरोप
नागेश पाटील आष्टीकर यांच्यावर सडकून टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आताचा खासदार नुसता फुटलाच नाही, आता याने गद्दाराचं नेतृत्व केलं असं कानावर आलं. हा आष्टीकर गद्दारांचा गद्दार. मी खासदारांची बैठक बोलवली होती. तीन खासदार घरी होते. बाकीचे सर्व ऑनलाईन होते. त्यात यवतमाळचे खासदार होते. आदल्या दिवशी फोन केला. काय करू, माझ्या मुलीला पाहायला पाहुणे येणार आहे. सोयरिक जुळवायची आहे. मला काय माहीत मुलीच्या ऐवजी यांची सोयरीक जुळवत होते. यांचा भाव ठरत होता. साहेब आम्ही तुमच्यासोबत आहोत म्हणून सांगत होते.
गद्दारी यांच्या रक्तात…
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘इथला तर हरामखोर, पोराला तिकीट घेतलं. मतदानाच्या आदल्या दिवशी मला फोन केला. म्हणाला एक दोन जणांना फोन केला तर मते आपल्याला मिळेल. पण नंतर मी विचारलं तर तो स्वत: गायब असल्याचं सांगितलं. नालायकपणा याच्या रक्तात भिनला आहे. गद्दारी याच्या रक्तात भिनली आहे. या गद्दार माणसांना उभं केलं. हे बुजगावणं उभं केलं. त्याची मी तुम्हाला माफी मागतो. ही सर्व लोकं वाघाचं कातडं पांघरलेले गाढवं होती. कोल्हे होते. ते लायकीचे लोक नाहीत. हिंगोलीचा जो पॅटर्न आहे तो इथे पाहिजे. तो इतिहास घडवा. आजपासून तुम्ही खासदार आहात. तुम्ही हिंगोलीची जबाबदारी सांभाळा.’
Leave a Reply