
बीडमधील केज येथे विलास घुले या युवकाची निर्घुण हत्या करण्यात आली या प्रकरणी पोलिस तपास सुरु आहे. हत्येच्या ठिकाणी तब्बल दहा ते बारा जण असल्याचं सांगितलं जात होतं मात्र त्यापैकी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले, या प्रकरणात पोलिसांनी 9 आरोपींना अटक केली आहे. मात्र, एका आरोपीला अद्याप अटक का करण्यात आली नाही, तो आरोपी पोलिसांचा लाडका आहे का? तसेच या संपूर्ण प्रकरणातून एका आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असा संशयही त्यांनी व्यक्त केला. इतकेच नाही तर दहावा आरोपी प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे मिटवण्यसाठी ठेवलंय का? असा सवालही त्यांनी उपस्थिक केला.
धनंजय मुंडे म्हणाले की, आमची कोणाशीही वैयक्तिक दुश्मनी नाही. हा विषय पूर्णपणे गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. 9 आरोपींना अटक केली तर दहावा आरोपी बाहेर का आहे, याचे उत्तर पोलिसांनी द्यावे. आम्ही देखील त्या आरोपीच्या अटकेसाठी रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला.
बीड जिल्ह्यात आतापर्यंत 22 हत्या झाल्या असून ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी सांगितले. एसपी सोडले तर कोणत्याही पोलिसाला आपले नाव वापरण्याचा अधिकार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. घुले कुटुंबीयांच्या पाठीशी आम्ही कायम उभे राहू, असेही त्यांनी म्हटले.
Leave a Reply