
पावसाळ्याच्या आगमनासोबत महाराष्ट्रात सण-उत्सवांची चाहूल लागते. या सणांपैकी सर्वप्रथम येणारा महत्त्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमा . या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी संसारासाठी वडाच्या झाडाची पूजा करून व्रत करतात. महाराष्ट्राच्या संस्कृतीत या सणाला विशेष महत्त्व आहे. प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांमधील आवडती पात्रेही हा सण खास पद्धतीने साजरा करताना दिसणार आहेत. 'वीण दोघातली ही तुटेना' या मालिकेत समर आणि स्वानंदी वटपौर्णिमा साजरी करणार आहेत.
समर आणि स्वानंदी यांच्या नात्यात आता एक नवा टप्पा येणार आहे. समर स्वानंदीला एका मोकळ्या माळरानावर फिरायला घेऊन जाणार आहे. ती जागा पाहून स्वानंदी खूप खुश होते. दुसऱ्या सरप्राइजसाठी समर तिला एका प्लांट नर्सरीमध्ये घेऊन जातो. तिथे समरने सुंदर फुलं आणि छोट्या रोपांच्या मदतीने 'आई लव्ह यू' असं लिहिलं आहे. समर आपल्या मनातील भावना स्वानंदीसमोर व्यक्त करणार आहे.
आता यावर स्वानंदीचं काय उत्तर असणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. समर स्वानंदी त्या माळरानावर एकत्र वृक्षारोपण करणार आहेत. स्वानंदीने अजूनही त्याच्या प्रेमाला उत्तर दिलेलं नसल्यामुळे समर म्हणतो, “जर आपल्या नात्यात तसं काही नाही, तर वटपौर्णिमेची पूजा करू नका.” आता वटपौर्णिमेच्या दिवशी समर येईल का, याची स्वानंदीला चिंता आहे. मात्र इथे स्वानंदीला एक सुखद धक्का बसणार आहे. तिथे आधीच आलेला समर इतर महिलांसोबत वडाच्या झाडाची पूजा करतोय, हे पाहून स्वानंदीच्या आनंदाला पारावार राहत नाही.
वटपौर्णिमेच्या विशेष प्रसंगाच्या चित्रीकरणाबद्दल सांगताना तेजश्री प्रधान म्हणाली, “मालिकेत ज्या महत्त्वाच्या टप्प्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते आणि त्याचसोबत पावसाचीही आपण सगळे वाट पाहत होतो. या दोन्ही गोष्टी एकत्र येणं म्हणजे जणू दुग्धशर्करा योगच होता. सामान्यतः पावसात शूटिंग करताना चिखल, साडी खराब होणं किंवा इलेक्ट्रिकल उपकरणांमुळे तंत्रज्ञांना होणाऱ्या अडचणी अशा अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. पण यावेळी मुंबईतल्या पहिल्या पावसामुळे सेटवरील प्रत्येकजण आनंदी होता आणि सगळे उत्साहाने काम करत होते.”
समर आणि स्वानंदी एकमेकांबद्दलच्या भावना कधी व्यक्त करणार आहेत, ते प्रेमात कधी पडणार, याची प्रेक्षकांना खूप उत्सुकता होती आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्यावर होती. लेखकांनी अतिशय सुंदर प्रसंग लिहिले आहेत आणि आम्ही ते तितक्याच प्रामाणिकपणे साकारले. प्रत्येक प्रसंगातील भावना वेगळी होती. एक कलाकार म्हणून त्या भावना अचूकपणे साकारणं हे आमच्यासाठी एक मोठं आव्हान होतं,” अशा शब्दांत तेजश्री व्यक्त झाली.





Leave a Reply