
महाराष्ट्राची लालपरी म्हणून ओळख असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस प्रवाशांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारने प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. एसटी बस स्थानकांवरील अस्वच्छतेचा कलंक पुसण्यासाठी आणि प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी येत्या १ जूनपासून राज्यातील महामंडळाच्या ताब्यातील सर्व शौचालये प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली आहे. याच्या अंमलबजावणीसाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे.
स्वच्छतेसाठी नवा पॅटर्न
गेल्या अनेक वर्षांपासून एसटी बस स्थानकांवरील अस्वच्छता हा प्रवाशांच्या चर्चेचा आणि तक्रारीचा विषय राहिला आहे. हे चित्र बदलण्यासाठी महामंडळाने आता कंबर कसली आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार, पैसे घ्या पण दर्जेदार सुविधा द्या, या तत्त्वावर आता काम केले जाणार आहे. यासाठी प्रवाशांच्या तिकीट दरावर २ रुपये स्वच्छता अधिभार लावण्यात येणार आहे. या संकलित निधीतून स्थानकांच्या स्वच्छतेसाठी व्यावसायिक कंत्राटदार निश्चित करण्यात आले आहेत.
महत्त्वाचे बदल काय?
येत्या १ जूनपासून एसटीच्या कामकाजात काही प्रमुख बदल पाहायला मिळणार आहेत. बस स्टॉपवर कचरा किंवा अस्वच्छता साचू नये म्हणून दर ४ तासांनी संपूर्ण परिसराची स्वच्छता करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केवळ बस स्टॉपच नव्हे, तर प्रत्येक बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यापूर्वी ती आतून आणि बाहेरून पूर्णपणे स्वच्छ असल्याची खात्री कंत्राटदाराला करावी लागणार आहे. महामंडळाच्या ताब्यातील शौचालयांसाठी प्रवाशांना आता एकही रुपया मोजावा लागणार नाही. १ जूनपासून ही सुविधा विनामूल्य असेल. एसटी प्रवाशांचा वेळ सत्कारणी लागावा आणि त्यांना वाचनाची गोडी लागावी, या उद्देशाने प्रत्येक बस स्थानकावर सुसज्ज वाचनालय उभारले जाणार आहे. रात्रंदिवस सेवा देणाऱ्या चालक आणि वाहकांसाठीही स्थानकांवर विश्रांतीच्या चांगल्या सोयी आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील.
१ जूनपासून अंमलबजावणी
दरम्यान या संपूर्ण प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली कंत्राट प्रक्रिया पूर्ण झाली आहे. प्रशासकीय स्तरावर तयारी अंतिम टप्प्यात आहे. १ जून रोजी एसटी महामंडळाचा वर्धापन दिन असून, याच मुहूर्तावर या सर्व सुविधांची भेट प्रवाशांना मिळणार आहे. परिवहन मंत्र्यांच्या या निर्णयामुळे लालपरीचा प्रवास आता अधिक सुखकर, स्वच्छ आणि सन्मानजनक होणार आहे. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Leave a Reply