• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मान्सूनचा तडाखा! मुंबईसह कोकणाला झोडपलं; रस्ते खचले, झाडे कोसळल्याने प्रचंड नुकसान

July 1, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही काळापासून मुंबईसह राज्यातील जनतेला पावसाची प्रतीक्षा होती, अशातच आज मान्सूनच्या पावसाने मुंबई उपनगरासह कोकणाला झोडपून काढले. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहने पाण्यात अडकली, तर खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. काही ठिकाणी पाण्यात वीजप्रवाह पसरल्याच्या तसेच वाहने नाल्यात वाहून गेल्याच्या धक्कादायक घटनाही समोर आल्या आहेत.

डोंबिवली आणि भिवंडी: वाहतूक ठप्प, वाहने पाण्यात बुडाली

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे मुसळधार पावसामुळे शीळफाटा–भारत गियर्स मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे अनेक वाहने अर्ध्याहून अधिक पाण्यात बुडाली, तर रस्त्याची एक बाजू पूर्णपणे बंद झाली. परिणामी या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. याशिवाय, डोंबिवली एमआयडीसी परिसरात एका घरावर मोठे आंब्याचे झाड कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

भिवंडी येथे सततच्या पावसामुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील परिस्थिती गंभीर बनली आहे. खराब रस्ते आणि पावसाचे पाणी यामुळे राजनोली, पिंपळनेर, मानकोली ते खारीगाव टोलनाका या परिसरात भीषण वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर 5 ते 7 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून अनेक प्रवासी तीन ते चार तासांपासून वाहतूक कोंडीत अडकले आहेत.

नवी मुंबई आणि वसई: पाण्यात वीजप्रवाह, नाल्यात वाहून गेली कार

नवी मुंबईतील नेरुळ परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एल. पी. ब्रिजखाली मुसळधार पावसादरम्यान विजेच्या तारेत शॉर्टसर्किट झाल्याने रस्त्यावर साचलेल्या पाण्यात वीजप्रवाह उतरला. या पाण्याच्या संपर्कात आल्याने दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी खाली कोसळल्या. स्थानिक नागरिकांनी तातडीने रिक्षाच्या मदतीने दोघींना बाहेर काढून डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून नेरुळ पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. वसई पूर्व येथे भरधाव पाण्याच्या प्रवाहात एक कार नाल्यात वाहून गेल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सुदैवाने चालकाने वेळीच कारमधून उडी मारून स्वतःचा जीव वाचवला.

रत्नागिरी: पहिल्याच पावसात नवा रस्ता खचला

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात पहिल्याच पावसाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मंडणगड–बाणकोट मार्गाचा मोठा भाग पावसामुळे खचला असून पालवणी फाटा परिसरात रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्या आहेत. यामुळे या मार्गावरील वाहतुकीस गंभीर धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निकृष्ट कामावर तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी झाडे कोसळली

मुंबई उपनगरात सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बांधकाम सुरू असलेल्या भागांना बसला आहे. पाणी साचण्याबरोबरच अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. मरोळच्या मिलिटरी रोडवर एक मोठे झाड अचानक तीन वाहनांवर कोसळल्याने चार जण जखमी झाले. तर जोगेश्वरी पश्चिमेतील ए. सी. रोडवर देखील एक मोठे झाड कोसळून तेथे उभा असलेला टेम्पो आणि विजेचा मीटर बॉक्स पूर्णपणे नुकसानग्रस्त झाला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मृतदेहाला रात्रभर लोक बसून का राहतात? पहारा का दिला जातो? वाचून धक्का बसेल!
  • या गाण्यात लिरिक्सच नाहीत, तरी 14 वर्षांनंतरही बनतायत हिट रील्स; यूट्यूबवर 5,900,000 मिलियन व्ह्यूज, ओळखलंत का?
  • भारतातील घुसखोरांचं आता काय खरं नाही! हकालपट्टीसाठी मास्टरप्लान, अमित शाहांनी बोलावली बैठक
  • ODI : वनडे सीरिजसाठी टीम जाहीर, 12 जुलैला पहिला सामना, कुणाला संधी?
  • चिमूटभर कापूर कोमट पाण्यात मिसळा आणि काय फायदे होतात ते पाहा, जाणून आजच सुरु कराल उपाय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in