
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांनी एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. माझ्याकडे भीमनवार यांच्या संदर्भातील सर्व घोटाळ्यांचे भक्कम पुरावे उपलब्ध आहेत, असंही त्यांनी सांगितलं. पुरावे असूनही सरकार भीमनवार यांचा राजीनामा का घेत नाही, असा संतप्त सवाल त्यांनी केला. भीमनवार यांनी नैतिकतेच्या आधारावर आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणीही रोहित पवारांनी लावून धरली आहे. यावेळी त्यांनी चाणक्यांचा संदर्भ दिला. ‘जर राजाचे किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याचे चारित्र्य संशयास्पद असेल, तर त्यांनी त्या पदावर राहू नये’, असे सांगत त्यांनी भीमनवार यांच्या पदावरून हकालपट्टीची मागणी केली.
अशोका बिल्डकॉन कंपनीसोबतच्या संबंधांवर प्रश्नचिन्ह रोहित पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी टेंडर प्रक्रियेवर आक्षेप घेतला. “सर्व टेंडर्स केवळ ‘अशोका बिल्डकॉन’ याच कंपनीला का दिली गेली? भीमनवार आणि अशोका बिल्डकॉन कंपनी यांच्यात नेमके काय संबंध आहेत?”, असा सवाल त्यांनी यावेळी स्क्रिनवर लिहिलेला मजकून दाखवून विचारला. भीमनवार यांनी आपल्या कार्यकाळातील शेवटच्या दिवसापर्यंत टेंडर्स काढले आणि घाईघाईने त्यावर सह्या केल्या, त्यामुळे या सर्व स्वाक्षऱ्यांची आणि टेंडर्सची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. एमपीएससी अध्यक्ष होण्यापूर्वी विवेक भीमनवार हे राज्याचे परिवहन आयुक्त म्हणून कार्यरत होते.
राज्यातील रस्त्यांची दुरवस्था आणि त्यातील घोटाळ्यांवर बोट ठेवत रोहित पवारांनी सरकारला घेरले. त्यांनी खालील आकडेवारी मांडत सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. राज्यात जवळपास 35000 किमी राज्यमार्ग आणि 15 हजार किमी राष्ट्रीय महामार्ग असे एकूण जवळपास 50 हजार किमीचे रस्ते आहेत. या रस्त्यांवरून राज्यातील 5 कोटी वाहनं धावतात आणि 12 कोटी नागरिकांचे जीवन यावर अवलंबून आहे. केवळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जनतेची सुरक्षा सरकारने पूर्णपणे वाऱ्यावर सोडली आहे, अशी घणाघाती टीका रोहित पवार यांनी केली. “या सर्व महाघोटाळ्यांची चौकशी सरकार कधी करणार?” असा सवाल करत रोहित पवारांनी या प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी केली आहे.
अधिकाऱ्यावर आधीच्या पदावर असताना हजारो कोटींच्या कथित घोटाळ्याचे आणि कंत्राट वाटपाचे गंभीर आरोप आहेत, अशा संशयास्पद प्रतिमेच्या व्यक्तीला लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा निर्णय घेणाऱ्या एमपीएससीसारख्या अत्यंत स्वायत्त आणि संवेदनशील संस्थेच्या सर्वोच्च पदावर बसवणे चुकीचे आहे, असं मत यावेळी रोहित पवार यांनी व्यक्त केलं.
Leave a Reply