
यवतमाळ : केवळ मटण नीट शिजले नाही म्हणून पत्नीचा स्वत:च्या मित्रासमोर नवऱ्याने पाणउतारा केल्याने दुखावलेल्या विवाहितेने विष पिऊन जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना यवतमाळ येथे घडली आहे. यवतमाळ येथील आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे या हसत्या खेळत्या संसाराची वाताहत झाली आहे. मित्रासमोर पतीने केलेला अपमान सहन झाल्याने या विवाहितेने विष प्राशन केले. तिला रुग्णालयात नेण्यात आले, परंतू तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
चेतना मनोज जाधव (३३) असे या दुर्दैवी मृत महिलेचे नाव आहे.चेतना जाधव हिच्यासाठी हा दिवस अखेरचा ठरेल असे कोणालाही वाटले नाही. चेतनाचा पती मनोज याने एका मित्राला घरी जेवायला बोलावले होते. मटणाची भाजी बेतशीर आणि चांगली कर अशा सूचना मनोज याने पत्नीला दिल्या. अंगणात जेवणाचा बेत रंगला होता. मात्र, मटण काही नीट शिजले नाही. त्यामुळे पाहुण्यासमोरच मनोज याचा पारा चढला. मटण व्यवस्थित शिजले नसल्याच्या कारणावरून त्याने पत्नीशी जोरदार वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद केवळ स्वयंपाकापुरता मर्यादित राहिला नाही. त्यात मनोज हा व्यसनी आणि संशयी स्वभावाचा असल्याने शब्दाला शब्द वाढत गेला.
बुधवारी झालेल्या अपमानाचा घाव चेतना हिच्या मनाला खोलवर लागला. त्यामुळे चेतनाने टोकाचे पाऊल उचलले. भरल्या ताटावरून घरात आत गेली आणि तिने विषारी औषध प्राशन केले. बाहेर येऊन जेव्हा तिने पतीला ही बाब सांगितली, तेव्हा एकच खळबळ उडाली. तिला तातडीने आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. पण खूपच उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.
मनोज हा दारूच्या आहारी गेला होता. यापूर्वीही २०१५ मध्ये त्याच्यावर कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल झाला होता. २०१७ मध्ये ‘पुन्हा सुखाने संसार करू’ या अटीवर चेतनाने त्याला माफ केले होते. मात्र, बुधवारी पतीने केलेल्या अपमानाने ती प्रचंड दुखावली आणि तिने हे टोकाचे पाऊल उचलले.
चेतनाचे मामा मनोहर राठोड ( रा. देवगाव) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चेतनाचा पती मनोज जाधव याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार दिली. त्यावरुन मनोज याला पोलिसांनी अटक केली. चेतनाच्या मृत्यूनंतर आर्णी ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. एका हसत्या खेळत्या संसाराची शुल्लक गोष्टीवरुन राखरांगोळी झाली. पोलीस उपनिरीक्षक पल्लवी निनगूरकर या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
Leave a Reply